नवी दिल्ली - दिल्ली ते चंडीगड हे 245 किलोमीटरचे अंतर केवळ दोन तासांत कापण्याचे भारतीय रेल्वेने समोर ठेवलेले लक्ष्य लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित वेगवान मार्गावर अनेक वळणे असूनही ताशी 200 किमी प्रति तास इतका रेल्वेचा वेग ठेवत हे लक्ष्य गाठण्याचा रेल्वेचा विचार आहे.
दिल्ली-चंडीगड मार्गासाठी फ्रान्समधील कंपनीची मदत घेतली जाणार आहे. सध्याच्या मार्गावर दहा मोठी वळणे असून, त्यांची एकत्रित लांबी सुमारे 32 किमी आहे. हा मार्ग सरळ करण्यासाठी बरीच जमीन अधिग्रहित करावी लागणार असल्याने आणि त्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता असल्याने रेल्वेने या पर्यायाचा विचार सोडून दिला आहे. त्याऐवजी केवळ वळणावर रेल्वेचा वेग कमी करून उर्वरित सरळ मार्गावर तो वाढविला जाणार आहे. त्यामुळे अनेक वळणे असूनही अंतर दोन तासांत गाठण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याबाबत रेल्वे मंत्रालय आशावादी आहे.
फ्रान्सच्या एसएनसीएफ रेल्वेला हे काम दिले असून, ते याबाबतचा धोरणात्मक आराखडा सादर करणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे दहा हजार कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे.
सध्या दिल्ली-चंडीगड हे अंतर कापण्यासाठी शताब्दी एक्स्प्रेसला साडेतीन तास लागतात.
|