नवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली. कॉंग्रेसचे आमदार आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे शांतीदूत आहेत, अशा शब्दांत इम्रान खान यांनी स्तुतीसुमने उधळली. खान यांच्या शपथविधीच्या सोहळ्यास उपस्थित राहिल्यावरून सिद्धू यांच्यावर विरोधकांसह स्वपक्षीय नेत्यांनीही टीका केली होती.
पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या देशाशी अर्थपूर्ण संवादाची अपेक्षा व्यक्त केली होती. खान यांच्या शपथविधीनंतर लगेचच मोदी यांनी या भावना कळविल्या होत्या. अर्थात, 'नवनियुक्त पंतप्रधानांना शुभेच्छा देणे म्हणजे दोन्ही देशांमध्ये खंडीत झालेली चर्चा पुन्हा सुरू करण्याचे निमंत्रण नाही', असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी आज ट्विट केले आहे. यात त्यांनी सिद्धू यांचे आभार मानले आहेत. 'पाकिस्तानला भेट दिल्यामुळे सिद्धू यांच्यावर जे टीका करत आहेत, ते उपखंडातील स्थैर्याचे विरोधक आहेत. या भागात शांतता असल्याशिवाय प्रगती होऊ शकणार नाही', असेही खान यांनी म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.