तिरुअनंतपुरम : केरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आत्तापर्यंत 483 जणांचा मृत्यू झाला असून, 15 जण अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज (गुरुवार) दिली.
केरळच्या नैसर्गिक आपत्तीनंतर या चर्चेसाठी विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील नागरिकांना या पुरापासून वाचविण्यासाठी बचावकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील 14.50 लाख लोकांना बचावकेंद्रात दाखल करण्यात आले आहे. सध्या 59,296 लोकांना 305 बचावकेंद्रात दाखल करण्यात आले आहे. सुमारे 57 हजार हेक्टरचे पिकांचे क्षेत्र नष्ट झाले. या पुरामध्ये झालेले नुकसान राज्याच्या वार्षिक उलाढालीपेक्षा जास्त आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस आल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली, असे विजयन म्हणाले.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान 98.5 मिमी पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, राज्यात 352.2 मिमी पाऊस आल्याचे विजयन यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.