नवी दिल्ली - ""भारतीय जनतेचा स्वच्छतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही; तोपर्यंत भारत देशास या स्वच्छता मोहिमेमध्ये यश येणार नाही. स्वच्छ भारत मोहिमेचा "व्यवस्था' व "विचार' या दोन्ही घटकांशी घनिष्ठ संबंध आहे. देशातील सव्वाशे कोटी नागरिक एकत्र आले, तर कोणतीही मोहिम अवघड नाही,'' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) केले. स्वच्छ भारत मोहिमेस तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोलत होते.
""एक हजार महात्मा गांधी, 1 लाख मोदी, सर्व मुख्यमंत्री आणि सर्व राज्य सरकारे एकत्र येऊनही स्वच्छ भारताचे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही. मात्र सव्वाशे कोटी भारतीय नागरिक एकत्र आले; तर ही स्वप्नपूर्ती नक्कीच होईल. स्वच्छतेची आवश्यकता कोणीच नाकारत नाही. मात्र आपल्याला हे काम स्वत: करावयाची इच्छा नसते. तेव्हा सरकारने स्वच्छता करावयाची वाट न पाहता; जनतेने स्वत:हून या मोहिमेमध्ये सहभाग घेण्याची आवश्यकता आहे,'' असे मोदी यांनी सांगितले.
|