टपाल बचत योजनांसाठीही 'आधार'

टपाल बचत योजनांसाठीही 'आधार'

क्रमांक जमा करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली: सरकारने बॅंक खात्यांपाठोपाठ आता टपाल कार्यालयांमधील बचत योजनांसाठीही "आधार' क्रमांक बंधनकारक केला आहे. यासोबतच, भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि किसान विकास पत्र (केव्हीसी) घेणाऱ्यांना "आधार' क्रमांक देणे आवश्‍यक राहील. या निर्णयामुळे सर्व खातेधारकांना 31 डिसेंबरपर्यंत "आधार' क्रमांक टपाल कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे.

या निर्णयाबाबत सरकारने 29 सप्टेंबरला चार वेगवेगळ्या अधिसूचना जारी केल्या होत्या. या निर्णयानुसार "आधार' क्रमांकाची सक्ती असली, तरी ज्या खातेधारकाकडे "आधार' क्रमांक नसेल, त्याला "आधार' क्रमांकासाठी अर्ज केल्याचा पुरावा द्यावा लागेल. तसेच विद्यमान खातेधारकांना 31 डिसेंबरपर्यंत आपला "आधार' क्रमांक टपाल कार्यालयाकडे जमा करावा लागेल.

सरकारने आधीच बॅंक खाती, मोबाईल फोन यासारख्या सेवांसाठी "आधार' क्रमांकाची सक्ती केली आहे. यात बॅंक खाती "आधार'शी जोडण्याची मुदत 31 डिसेंबर 2017 करण्यात आली आहे, तर मोबाईल क्रमांक सहा फेब्रुवारीपर्यंत "आधार'ला जोडता येईल. दरम्यान, गेल्याच महिन्यात सरकारी योजनांचा आणि अंशदानाचा लाभ घेण्यासाठी "आधार' क्रमांक असण्याची कालमर्यादा 30 सप्टेंबरवरून वाढवून 31 डिसेंबर केली आहे. यामध्ये 35 मंत्रालयांच्या 135 योजनांचा समावेश केला जाणार आहे.

वाहन परवानाही जोडणार?
याशिवाय, वाहन चालविण्याचा परवानाही (ड्रायव्हिंग लायसन्स) "आधार' क्रमांकाशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री स्मृती इराणी यांनी अलीकडेच याबाबत सूतोवाच करताना "पॅन' कार्डाशी आधार क्रमांक जोडल्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्सही "आधार'शी जोडले जाईल, असे म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com