मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच
रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत गरीबांनाही उपचार मिळणार आहे, असे मोदींनी सांगितले आहे. अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जगातील अनेक संघटना या योजनेचा अभ्यास करतील. 14555 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन तुम्ही आयुष्मान भारत योजनेसंबंधी माहिती घेऊ शकता असे यावेळी मोदींनी स्पष्ट केले आहे. यावेळी, आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास हेही उपस्थित होते.
आयुष्मान भारत योजना काय आहे ?
1) या योजनेअंतर्गत देशातील 10 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य विमा मिळणार आहे.
2) यामध्ये महाराष्ट्राचाही सहभाग आहे. 2011 च्या जनगणनेमधील सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नांच्या नोंदीवरून सुमारे 84 लाख कुटुंबांची निवड केली आहे. या योजनेसाठी केंद्राकडून 60 टक्के तर 40 टक्के राज्याकडून आर्थिक तरतूद केली जाणार आहे.
3) लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
4) दीड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु होणार आहे.
5) 25 सप्टेंबरपासून आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
5) तब्बल, 1300 आजारांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
6) जे राज्य या योजनेशी जोडली आहेत त्या राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात गेले तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
7) 13 हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत.
8) आयुष्मान भारत योजनेसाठी शहरी भागातील 11 वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांची निवड केली आहे.
9) सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 971 सेवांव्यतिरिक्त सुमारे 400 आरोग्यसेवा या योजनेंतर्गत कुटुंबांना मोफत मिळणार आहेत.
10) विमा कंपन्यांसोबत संपूर्ण पाच लाखांचा विमा करार केल्यास हप्त्याची रक्कमही वाढेल. त्यामुळे मधला मार्ग निवडून सुमारे एक ते दीड लाखापर्यंतचा कुटुंबांचा विमा उतरविण्यात येईल.
महाराष्ट्रतील 83 लाख कुटुंबाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये, राज्यातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये आयुष्मान भारत योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातून सुमारे 58 लाख आणि शहरी भागातून सुमारे 24 लाख कुटुंबांची निवड केली आहे. ग्रामीण भागामध्ये जळगाव, नाशिक, यवतमाळ या जिल्ह्य़ांमधील सर्वाधिक कुटुंबाची निवड केली आहे. तसेच, शहरी भागामध्ये सर्वाधिक कुटुंबांची निवड मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे भागांमधून केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.