केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांची जयगड बंदरावर घोषणा
रत्नागिरी - सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीकरिता राज्याला 10 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी केली. नद्यांच्या विकासाकरिता जलमार्ग तयार केला जाणार आहे. कोस्टल इंडस्ट्रियल झोनमुळे कोकण समृद्ध बनेल, असेही ते म्हणाले.
रत्नागिरीमधील जयगड बंदरावर जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने आधुनिक बंदर तयार करण्यात आले आहे. या बंदरावर पहिल्यांदाच दोन हजार टनाचे प्रचंड जहाज आले आहे. या निमित्ताने "सार्क' प्रकल्पाचे अनावरण झाले. सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतूक प्रकल्पांना चालना मिळावी, याकरिता 15 हजार कोटी मिळणार आहेत. त्यापैकी 10 हजार कोटी राज्य सरकारला दिले जातील. केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे कंपनी स्थापन करावी लागेल. यंदा जेएनपीटीला 1300 कोटींचा फायदा झाला आहे. भविष्यात 15 लाख कोटींची देशात गुंतवणूक होईल. गुंतवणुकीतील काही प्रकल्पांचे कामही सुरू झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.
जयगड बंदरापासून डिंगणीपर्यंत लोहमार्ग तयार करण्याच्या कामाची सुरवात या वेळी करण्यात आली. या 45 किलोमीटर मार्गावर 23 ब्रिज आणि सहा बोगदे असून, 4.73 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. या प्रकल्पाकरिता 771 कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यात जेएसडब्ल्यूचा 63, कोकण रेल्वेचा 26 आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचा 11 टक्के हिस्सा असेल. या प्रकल्पामुळे कोल्हापूर आणि हैदराबाद जोडले जातील. भविष्यात देशातील सर्व बंदरे रेल्वेने जोडली जातील, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
उद्योगाला चालना मिळेल - फडणवीस
जयगड बंदरामुळे उद्योगाला चालना मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशाच्या विकासात बंदरांचा महत्त्वाचा वाटा असतो. समुद्रामार्गे होणारा व्यापार फायदेशीर ठरतो. बंदरे जोडण्याची कामे रेल्वेने हाती घेतली आहेत. कोकणात पर्यटन वाढण्याकरिता समुद्रतटांचा विस्तार केला जात आहे. चिपी आणि रत्नागिरी विमानतळाचे काम सुरू आहे. कोकणातील पर्यटनासाठी जेएसडब्ल्यूने हातभार लावावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
|