उपनगराध्यक्षपदावर काँग्रेस दावा करणार

सावंतवाडी - येथील काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेतली.
सावंतवाडी - येथील काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेतली.

सावंतवाडी - काँग्रेसतर्फे सावंतवाडी उपनगराध्यक्षपदावर उद्या (ता. २८) होणाऱ्या निवडणुकीत दावा करण्यात येणार आहे. त्यासाठी गटनेते राजू बेग यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. नाट्यमय घडामोडी घडून आम्ही नक्कीच हे पद ताब्यात घेऊ, असा दावा काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज येथे केला.

काँग्रेसच्या पालिका अजेंड्यात असल्याप्रमाणे शहरात भुयारी गटार योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसंगी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज येथील माजी खासदार कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी नुकतीच गटनेते म्हणून निवड केलेले राजू बेग यांच्यासह सुधीर आडिवरेकर, परिमल नाईक, उदय नाईक, नासीर शेख, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर आदी उपस्थित होत्या. या वेळी ॲड. नाईक म्हणाले, ‘‘उद्या होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस दावा करणार आहे. त्यासाठी काँग्रेस नेते श्री. राणे यांनी श्री. बेग यांचे नाव निश्‍चित केले आहे. त्यामुळे आता बेग यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. आयत्या वेळी नाट्यमय घडामोडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निश्‍चितच काँग्रेसचा उपनगराध्यक्ष बसणार आहे.’’

श्री. शेख म्हणाले, ‘‘श्री. राणे यांनी शहराला आपल्या आमदार निधीतून चाळीस लाख रुपये दिले आहेत. त्या माध्यमातून शहरातील रस्त्यांची तसेच अंतर्गत रस्ते आदी कामे घेण्यात येणार आहेत. हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.’’

शहरात भुयारी गटार योजना खर्चिक बाब असल्यामुळे ती करणार नाही, अशी भूमिका नगराध्यक्ष साळगावकर यांनी मांडली होती. याबाबत ॲड. नाईक  म्हणाले, ‘‘काही झाले तरी आम्ही ही योजना यशस्वी करून दाखविणार आहोत. लोकांची मागणी आणि डासांची संख्या लक्षात घेता भुयारी गटार योजना यशस्वी करण्यासाठी आमची प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी आहे.’’

श्री. शेख म्हणाले, ‘‘तत्कालीन नगराध्यक्ष श्‍वेता शिरोडकर यांच्या काळात या योजनेचे सर्वेक्षण सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते; मात्र सौ. शिरोडकर यांना त्याचे श्रेय मिळू नये यासाठी ही योजना बासनात गुंडाळण्यात आली.’’

नियमाबाबत हायकोर्टात जाणार 
या वेळी श्री. नाईक म्हणाले, ‘‘पालिका निवडणुकानंतर सत्ताधाऱ्यांनी नगराध्यक्षांना मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आहेत. डॉक्‍टरचे प्रिस्किप्शन बदलावे तसेच अध्यादेश काढून शासकीय अध्यादेश बदलण्याचे काम या सरकारकडून होत आहे. या विरोधात आपण हायकोर्टात दाद मागणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com