रायगड - मृगगडावरील माहिती फलक अज्ञातांनी तोडले

Mrigagad
Mrigagad

पाली (रायगड) : श्रमदानासोबत गडांबाबात जनजागृती व गडाचा प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे. गडाचे महत्व व इतिहास सर्वांसमोर यावा यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी अात्तापर्यंत अनेक गडांवर अगदी खडतर प्रयत्नांनी व परिश्रमांनी अवजड माहिती फलक बसविले अाहेत. मात्र रविवारी (ता.१८) मृगगडावरील मोठा माहिती फलक कोणी अज्ञात समाजकंटकांनी मोडून टाकाला असल्याचे व त्याबरोबर एक छोटा माहिती फलक देखिल गहाळ केले असल्याचे दुर्ग प्रेमींच्या निदर्शनास अाले.

दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गेल्या तीन वर्षांपासून सुधागड तालुक्यातील भेलीव गावाजवळील मृगगड येथे श्रमदान मोहिमांचे आयोजन करण्यात येते. गडावरील पायवाटा स्वच्छ करणे, टाकी साफ करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, दिशादर्शक व माहिती फलक लावणे अशा प्रकारची कामे आजवर पूर्णत्वास नेण्यात आलेली आहेत. २४ सप्टेंबर २०१७ ला गडावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रामदास घाडी, प्रज्वल पाटील, नितीन पाटोळे, सचिन रेडेकर, प्रशांत घाडीगांवकर, सदानंद रेडकर, सुदर्शन मोहिते, अक्षय देसाई राहुल रोकडे अादी दुर्गवीर स्वयंसेवक उपस्थित होते. 

दुर्गप्रेमींनी या मोहिमेत गडावर येणा-या दुर्गप्रेमींना माहिती मिळावी म्हणुन स्वखर्चाने ५० किलो वजनी माहिती फलक निमुळती पायवाट आणि निमुळत्या व खोल धोकादायक घळीतुन खालुन गडावर नेऊन माचीवर उभा केला. पण हे काम काही समाज कंटकांना खटकले, एवढी मेहनत करून गडावर उभारलेला फलक चक्क तोडून टाकला. या बरोबरच दिशादर्शक फलक देखिल गायब केले आहेत. या घटनेमुळे दुर्ग प्रेमींमध्ये प्रचंड संताप व चीड निर्माण झाली आहे. सोशल मिडियावर या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

हेमानगड, सुरगड, मृगगड, वल्लभगड, साल्हेर, मुल्हेर, सामानगड, कलानीधीगड आणि महिपालगडावर काम करत आहेत. हे काम अविरत करत राहणार तसेच जिथे जिथे गडांना आमची गरज आहे तिथे आम्ही उभे राहू अशी ग्वाही दुर्गवीरच्या स्वंसेवकांनी सकाळला दिली. वर्षभरापुर्वी असा प्रकार कोल्हापुर जिल्ह्यातील सामानगडला घडला आहे. त्यामुळे दुर्गवीर व दुर्गप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.

दुर्गवीर प्रतिष्ठाणने अाडवाटेवरील गड-किल्ल्यांना दिली नवसंजीवनी
दुर्गवीर प्रतिष्ठान गेल्या ९ वर्षांपासून दुर्लक्षीत गडांचे संवर्धनाचे कार्य करत आहे. आजवर कधीच कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याच्या वादात पडले नाहीत. नेहमीच वेगवेगळ्या अपरिचित गडावर काम सुरू ठेवले. मृगगडसारख्या आडवाटेवरच्या गडावर कामाची सुरवात 3 वर्षा पूर्वी झाली. महिन्या दोन महिन्यातून गडावर काम सुरू होते. पण गेल्या काही वर्षात "गडाच्या कामाचे श्रेय" घेण्यासाठी सगळ्यांची धावपळ दिसत होती. अवचितगडावर दीड वर्ष काम केल्यावर स्थानिक लोक तयार झाल्यानंतर ह्या गडावरील कार्य थांबवले. तसेच तीन वर्षांपासून भिवगड वर तीन टाके, पायऱ्या अश्या अनेक वास्तू स्वच्छ केल्या. तिथे दुसऱ्या संस्थेने काम करण्याची इच्छा व्यक्त केली, त्यांनी कामाची सुरवात केली दुर्गवीरने इथेही काम कमी करून दुसऱ्यागडावर लक्ष केंद्रित केले. कारण त्यांचा अाणि दुर्गवीरचा हेतु एकच होता ते म्हणजे "गडाचे संवर्धन" अशा प्रकारे दुर्गवीरचे काम अतिशय प्रामाणिकपणे, संयमाने व निष्ठेने सुरु अाहे.

९ वर्षात आम्ही करत असलेल्या कामाचंच नेहमी काही लोकांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आमची मुल काट्याकुट्यातुन धडपडुन काम करत होते (अर्थात ती आमची आवड आहे) तेव्हा कुणी पुढे यायला तयार नव्हते पण जेव्हा कामाला एक पूर्ण रुप प्राप्त होतेय म्हटल्यावर एखादी मेहिम करुन आम्ही खुप मोठे काही करतोय हे भासवून श्रेय घेणारे तयार व्हायला लागलेत. आम्हाला या श्रेयवादात पडण्यात कधी रस नव्हता, आणि या पुढेही नसेल, पण काम हे गडावर आणि गडासाठी होते तरी ही वृत्ती लोकांच्या मनात यावी. कामाने तुम्ही मोठे होण्यापेक्षा गड सावरायला हवा ही वृत्ती जणु हरवत चाललीय. सगळी प्रसिद्धीची गणित मांडुन मोहिमा ठरवायच्या आणि आयत्या बिळावर नागोबा होऊन रहायच हे कितपत योग्य आहे. मग तिथे गेली अनेक वर्ष निस्वार्थपणे राबणाऱ्यांनी त्यांची मेहनत कुणी वापरुन घेतंय हे पाहत रहायच. प्रत्येक वेळी आम्ही शांत राहिलो पण या फलकांची अवस्था पाहून हळहळलोय, केलेली मेहनत वाया गेली अस वाटू लागलंय, पण आम्ही थांबणार नाही. आम्ही अविरतपणे काम करितच राहणार. कारण आमची मेहनत त्या गडाने पाहिलेली आहे, माझी एकच कळकळीची विंनती आहे हे गडकिल्ले आपले आहेत आणि त्यांची निगा सुद्धा आपणच राखली पाहिजे त्यामुळे अस नुकसान कधी करू नका, असे मत दुर्गवीर प्रतिष्ठान उपाध्यक्ष अजित राणे यांनी व्यक्त केले. 

असा अाहे मृगगड
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातून पूढे आतमध्ये माणखोर्‍यातुन भेलीव गावालगत मृगगड हा किल्ला आहे. घाट ओलांडुन कोकणात येणार्‍या शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी शिवरायांना हा किल्ला महत्वाचा वाटला. या किल्यास भेलीवचा किल्ला असेही संबोधले जाते. किल्यावर जाण्यास भेलीव गावाकडुन एक तास लागतो. मृगगडावरील बालेकिल्यावर चढण्यासाठी दगडाला खोदुन पायर्‍या केल्या आहेत वर चढताना उधळा किल्ला व मोराडीचा सुळका पहायला मिळतो. तसेच किल्यावर किल्लेदार व त्यांच्या सहकार्‍यांसाठी बांधलेल्या घरांचे अवशेष, दोन कोठारे याचबरोबर माथ्यावर पायर्‍यांची विहिर व तीन पाण्याची टाकी आहेत. पावसाळ्यात किल्यावर जाणे तसे कठीणच पण आजूबाजूचा निसर्ग मन ओढुन घेतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com