सरसकट कर्जमाफी न दिल्यास आंदोलन - सुप्रिया सुळे

सरसकट कर्जमाफी न दिल्यास आंदोलन -  सुप्रिया सुळे

दाभोळ - भाजप सरकारने २५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास १ डिसेंबरपासून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन छेडेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोली येथे दिला.

दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी व कोकणावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, संजय कदम, निरंजन डावखरे, रत्नागिरी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण आदी उपस्थित होते.

मोर्चाच्या समाप्तीनंतर केळसकर नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली. सुप्रिया सुळे यांनी भाजप-सेना सरकारवर कडाडून टीका करत विविध मुद्द्यांना हात घातला. दापोलीकरांच्या वतीने आयोजित केलेले हे आंदोलन आदर्श आंदोलन असून पक्षाचे स्थानिक आमदार संजय कदम यांनी उत्तम पद्धतीने त्याचे नियोजन केले होते. आंदोलनात मध्येच आमदार कदम हे दिसले नाहीत, त्यावेळी मी कार्यकर्त्यांना विचारले. कार्यकर्त्यांनी ते एसटीच्या प्रश्‍नाबाबत विचारणा करण्यासाठी बस स्थानकात गेल्याचे सांगितले. खरोखरच एसटीचा प्रश्‍न संपूर्ण राज्यात संवेदनशील असून जनसामान्यांशी निगडित आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे सरकार राज्यात सत्तेवर आले तर बुलेट ट्रेनचा निधी एसटीकडे वळवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जनतेचे अनेक प्रश्‍न असून कर्जमाफी ही तुटपुंजी झाली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून पवार साहेबांनी देशाच्या शेतीसंदर्भात घेतलेले बहुसंख्य निर्णय या सरकारने बदलले आहेत. कोणत्याही पिकाला हमीभाव मिळत नाही. गॅस सिलिंडरच्या भाववाढीमुळे गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे. महागाईमुळे हातातोंडाशी जुळवाजुळव होत नाही, अशी परिस्थिती आहे. आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरात या भाईंचा १३ हजार मतांनी पराभव केला असून २०१९ मध्ये आपण या भाईंच्या दादाचा २६ हजाराने पराभव करू, असे सांगितले. 

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आमदार, एक खासदार हवा
जनतेची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्यामध्ये राष्ट्रवादीचे सरकार येणे गरजेचे आहे. यासाठी आतापासूनच कार्यरत व्हावे, असे आवाहन करताना जिल्ह्यामध्ये ४ आमदार व १ खासदार निवडून आणणे गरजेचे असल्याचे सुळे यांनी सांगितले.

आमदार कदमांचा रामदास कदमांना चिमटा
महागाईला हे सरकार कारणीभूत आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या खात्याचा एक रुपयाही या मतदारसंघात आणला असेल, तर आपण तातडीने राजीनामा देऊ. ’घार फिरे आकाशी....’ अशी जाहिरात रामदासभाईंच्या समर्थकांतून केली जाते. मात्र, तिचे चित्त मुलापाशी असल्याचे सांगण्यास ते विसरत आहेत, असा चिमटा आमदार संजय कदम यांनी काढला.

शिवसैनिक वाघ होते, आता मांजर झाले आहे
कारभाराला भाजपचे सरकार कारणीभूत असून शिवसेनाही सरकारच्या कारभाराला तितकीच जबाबदार आहे. शिवसेनेचे सैनिक हे कधीकाळी वाघ होते, आता त्यांची, मांजरच झाले आहे, अशी टीका करत ‘मी लाभार्थी’च्या जाहिरातीत उद्धव ठाकरेंचा किंवा सेनेच्या एकाही मंत्र्याचा फोटो नसल्याचा दाखला सुळे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com