भाजप सरकारमुळे दलित, मुस्लिम असुरक्षित - आनंदराज आंबेडकर

भाजप सरकारमुळे दलित, मुस्लिम असुरक्षित - आनंदराज आंबेडकर

चिपळूण -‘ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशातील जनता भिकारी’ या म्हणीप्रमाणे देशाची वाईट अवस्था झाली आहे. दलित आणि मुस्लिम देशांत असुरक्षित आहेत. भाजपचे नेते राजकारणासाठी देशात दुही माजविण्याचे काम करीत आहेत, अशी टीका रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. 

रिपब्लिकन सेनेतर्फे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी आंबेडकर आज येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, देशातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने मोदींना निवडून दिले. मात्र सामाजिक सलोखा, विकास अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरली आहे.

शेजारचे एकही राष्ट्र भारताचा मित्र राहिलेला नाही. मोदी सरकारच्या काळात झालेले हजारो कोटीचे घोटाळे आता बाहेर पडत आहेत. ५०० कोटीची विमाने १५०० कोटीमध्ये मोदी सरकारने घेतले. हे सरकार गरीब व सामान्य लोकांचे हित लक्षात न घेता श्रीमंत लोकांसाठीच काम करते. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात जाऊन परदेशी देशांना डॉलरमध्ये मदत जाहीर करत आहेत. भाजप सरकारमुळे अल्पसंख्याक समाज असुरक्षित आहे. दलित आणि मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. सत्तेच्या पडद्यामागून अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात मुस्लिमांचे योगदान असताना मुस्लिमांनी देशात राहू नये असे भाजप नेते सांगतात. म्हणजेच त्यांना सत्तेचा माज आहे.

आठवले सत्तेला चिकटून 
रामदास आठवडे यांनी आंबेडकरी जनतेच्या नावावर राजकारण करून केंद्रात मंत्रीपद मिळवले. आंबेडकरी जनतेवर हल्ला होत असताना आठवले गप्प राहिले. त्यामुळे आठवलेंना आंबेडकरी जनतेचे किंवा दलितांचे नेते म्हणायचे का असा प्रश्‍न पडतो. महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कायदा करण्यास विरोध झाला म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दलितांवर हल्ला होत असताना आठवले मात्र सत्तेला चिकटून राहिल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली.

रयतेच्या राजाचे महत्त्व सांगणार
महाराष्ट्रात दोन वेळा शिवजयंती होणे ही बाब चुकीची आणि दुर्दैवी आहे. यातून शिवजयंतीचे महत्त्व कमी करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रतिपालक होते; परंतु काहींनी राजकारणासाठी राष्ट्रपुरुषांची वाटणी करून घेतली आहे. आम्ही तसे होऊ देणार नाही. रयतेच्या या राजाचे महत्त्व आम्ही लोकांना पटवून सांगणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com