जलप्रवासाच्या स्वप्नपूर्तीसाठी धडपड

जलप्रवासाच्या स्वप्नपूर्तीसाठी धडपड

रत्नागिरी - मुंबई ते दिघीपर्यंत जलवाहतूक सुरू झाली असली तरीही दिघी ते दाभोळ प्रवास तांत्रिक अडचणीत सापडला आहे. बंद पडलेली जलवाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) चंग बांधला आहे. त्यासाठी सोमवारी (ता. २३) अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक होणार असून त्यात उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई ते दाभोळ जलवाहतूक सुरू करण्यात येणार होती; मात्र तांत्रिक अडचणींमुळे हा प्रवास दिघीपर्यंतच थांबला. फेरीबोटीच्या स्वागतासाठी दाभोळवासीयांसह रत्नागिरीकर सज्ज झाले होते. पहिल्या प्रवासासाठी अनेकजणं इच्छुक होते. तांत्रिक अडचणींमुळे अखेर एमएमबीला हा प्रवास दिघीपर्यंतच थांबवावा लागला. मुंबई ते दिघीपर्यंतच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार १५ प्रवासी बनले. रत्नागिरीत प्रथमच ही बोट येत असल्याने सर्वांनाच उत्सुकता होती.

दिवाळीच्या दिवशी या फेरीचे पहिलेच प्रात्यक्षिक होते. दिघी ते दाभोळ अंतर कापण्यासाठी किमान सहा तासांचा कालावधी लागणार आहे; परंतु त्यासाठी बोटीच्या वेगाला पाण्याचे प्रवाह आणि वाऱ्याच्या वेगाची साथ मिळणे आवश्‍यक आहे. अन्यथा हा प्रवास लांबण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. यामधील अडथळे लक्षात घेऊन एमएमबीने दिघी ते दाभोळचे प्रात्यक्षिक थांबविण्याचा निर्णय घेतला.

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना रम्य कोकण न्याहाळत प्रवास करता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत नवा भाऊचा धक्का (मुंबई) ते दाभोळ अशी फेरीबोट सेवा सुरू करण्याचा हा निर्णय घेतला. त्यासाठी एमव्ही रावी, एम. व्ही. शिवम आणि एमव्ही केपीएस या बोटीही निश्‍चित केल्या आहेत. दाभोळच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एमएमबीने लगेचच पावले उचलली आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यावर तोडगाही काढला आहे. सुरक्षित आणि कंटाळवाणा प्रवास होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे एमएमबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. फेरीबोटीचा प्रवास सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा सोमवारी होणार आहे. त्यात पहिल्या प्रवासाची तारीख निश्‍चित होणार आहे. त्याचबरोबर प्रवासाचे नवीन वेळापत्रकही त्यात निश्‍चित केले जाणार आहे.

दिवसाचा प्रवास
सुधारणा केलेल्या वेळापत्रकानुसार त्या बोटीचा जलप्रवास शक्‍यतो दिवसा चालविण्याचा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने विचारमंथन सुरू असून लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. दुपारी साडेबारा वाजता बोट दिघीहून सुटली की सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत दाभोळला पोचेल. तिचा परतीचा प्रवास दुसऱ्या दिवशी सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com