आमदार वैभव नाईक यांचा अदृश्‍य निधी दिसणार कधी? - दत्ता सामंत

आमदार वैभव नाईक यांचा अदृश्‍य निधी दिसणार कधी? - दत्ता सामंत

मालवण - गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी तीन कोटी आणले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये खड्डे बुजविण्यासाठी ३० कोटी आणले, असे वृत्तपत्रांतून आणि सोशल मीडियातून जाहीर करणाऱ्या शिवसेनेच्या आमदार वैभव नाईक यांचा अदृश्‍य निधी जनतेला दिसणार कधी? मतदारांशी नेहमी खोटे बोलून आपल्या पुड्या सोडण्याचे काम नाईक करीत आहेत. यामुळे प्रत्यक्षात खड्डेमय रस्ते आणि विकासनिधीबाबत आश्‍वासनेच मतदारांना मिळत आहेत, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी केले.

येथील पंचायत समितीच्या सभापती कक्षात ‘स्वाभिमान’च्या 
प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीनंतर श्री. सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी अशोक सावंत, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र चव्हाण, जेरान फर्नांडिस, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, ‘‘जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. शिवसेना खासदार आणि आमदार यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासासाठी कोणत्याही योजना राबविण्यात येत नाहीत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आणलेले प्रकल्प पूर्ण केले जाताना दिसत नाहीत. सी वर्ल्ड, रेडी बंदर, दोडामार्ग एमआयडीसी या प्रकल्पांबाबत पालकमंत्री एकही शब्द काढताना दिसत नाहीत. आरोग्य यंत्रणाच सलाईनवर पोचलेली आहे. जिल्ह्यात तापसरीने थैमान घातलेले असताना पालकमंत्री मुंबईत बसून आहेत; तर शिवसेना खासदार व आमदार हे लग्न समारंभात व्यस्त आहेत. ओखी चक्रीवादळात मच्छीमारांचे कोट्यवधीचे नुकसान झालेले असताना सत्ताधाऱ्यांकडून मदतीसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.’’

ते म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील खड्डेमय रस्त्यांमुळे पाठीच्या दुखण्याचे आजार सर्वसामान्यांना जडले आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ८ डिसेंबरला निवेदन सादर करण्यात येणार आहे. या वेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे हेही उपस्थित राहणार आहेत. तसेच, मालवणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सभासद नोंदणी लवकरच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे,’’ असेही सामंत म्हणाले.

आमदारांमध्ये निधी आणण्याची धमक नाही
आमदार वैभव नाईक यांच्यात निधी आणण्याची धमकच नाही. मुंबईला जाऊन मंत्र्यांच्या भेटी घेऊन आपली टिमकी वाजविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. भाजपच्या पाठपुराव्याने आलेल्या निधीलाही सेना आपला पाठपुरावा सांगून यासाठी लाचार झालेली दिसत आहे. आमदारांनी आणलेल्या निधीतून झालेल्या दुरुस्तीची कामे दाखवावीत, अन्यथा आम्ही खड्डेमय रस्त्यांची छायाचित्रे दाखवू, असा टोलाही श्री. सामंत यांनी लगावला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com