गद्दारांना कणकवलीवासीयच धडा शिकवतील - नारायण राणे

कणकवली ः येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन शनिवारी करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे. शेजारी नितेश राणे, नीलम राणे, समीर नलावडे आदी. (छायाचित्र ः अनिकेत उचले)
कणकवली ः येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन शनिवारी करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे. शेजारी नितेश राणे, नीलम राणे, समीर नलावडे आदी. (छायाचित्र ः अनिकेत उचले)

कणकवली - ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येथील नगरपंचायत स्वबळावर लढवणार आहे. आम्हाला कुठल्याही युती-आघाडीची गरज नाही. आमदार नितेश राणे यांच्याकडे प्रचाराची धुरा असेल. गरज लागलीच तर मी प्रचारात येईन. कणकवलीत राजकीय दुकाने थाटलेल्या गद्दारांना जनताच या निवडणुकीत जागा दाखवेल,’ असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी येथे दिला.

येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी बाजारपेठ ढालकाठी येथील शहर स्वाभिमान पक्ष निवडणूक कार्यालयाचा प्रारंभ श्री. राणे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. राणे यांनी दावा केला, की नगरपंचायतीच्या सर्व १७ जागा आणि नगराध्यक्ष निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान स्वबळावर लढणार आहे. आम्हाला पूर्ण विजयाची खात्री असल्याने कुठल्याही पक्षाशी युती-आघाडीची आम्हाला गरज नाही. विजयाची खात्री नसते, त्यांनाच आघाड्या कराव्या लागतात. नगरपंचायतीला काही लोकांनी पोटापाण्याचे साधन बनविले आहे. राजकीय दुकाने मांडली आहेत. त्यांची ही दुकानदारी या निवडणुकीत बंद होईल. जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.

विकासाच्या वल्गना कुणी करू नयेत. राज्याच्या बजेटला ४० टक्‍क्‍यांचा कट लागला आहे. फेब्रुवारी संपत आला, तरी निधी नाही. कणकवलीत ज्या काही नागरी सुविधा आहेत, त्या आम्ही दिल्या आहेत. शहराची एवढीच काळजी असेल तर पहिल्यांदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्‍टर आणा. रिक्‍तपदांची भरती करा, त्यानंतरच विकासाचे ढोल बडवा.
- नारायण राणे, 

स्वाभिमान पक्षाचे संस्थापक

श्री. राणे यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, ‘‘फुकाची घोषणाबाजी करणे हेच राज्यमंत्री चव्हाण यांचे काम झाले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक घोषणा केल्या. यांतील किती पूर्ण केल्या, त्याची माहिती द्यावी. जिल्ह्यातील कुठल्या नगरपंचायतीला पाच कोटी कुठल्या माध्यमातून दिले, हेदेखील जाहीर करावे. श्री. चव्हाण यांनी कोटींची उड्डाणे करण्याऐवजी आधी शालेय पोषण आहार व अंगणवाड्यांचे थकलेले अनुदान द्यावे. नंतरच कोट्यवधींच्या निधीची घोषणा करावी.’’

कार्यालयाचे उद्‌घाटन ढोल-ताशे, फटाक्‍यांच्या आतषबाजीत झाले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमानचे शहराध्यक्ष समीर नलावडे, नीलम राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, गोट्या सावंत, सुरेश सावंत, नगरसेविका मेघा गांगण, बंडू हर्णे, अण्णा कोदे, माया सांब्रेकर, सुविधा साटम, अभिजित मुसळे, किशोर राणे, गौतम खुडकर, माजी नगरसेवक उमेश वाळके, संजय मालंडकर यांच्यासह सोनू सावंत, निखिल आचरेकर, संदीप नलावडे, दीपक बेलवलकर, निसार काझी, भालचंद्र साठे आदी स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com