आरोग्यमंत्री सावंत यांना आश्‍वासनाचा विसर - विनय मोरे

आरोग्यमंत्री सावंत यांना आश्‍वासनाचा विसर - विनय मोरे

सावंतवाडी - अपघाती व्यक्तीला तत्काळ आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी पहिल्या तीन दिवसाचा खर्च माफ करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लवकरच योग्य तो अध्यादेश काढण्यात येईल, असे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी जाहीर केले होते; मात्र त्यांना आपल्या आश्‍वासनाचा आता विसर पडला आहे, अशी खंत सारथी सुरक्षा संस्थेचे प्रवक्ते तथा मुख्यमंत्री गौरव पुरस्कार प्राप्त विनय मोरे यांनी येथे व्यक्त केली. 

राज्यात वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता ते कमी करण्यासाठी आमच्या संस्थेने अनेक वर्षे शासनाकडे पाठपुरावा 
केला आहे. त्यात आम्हाला परवानगी द्या, आम्ही जनजागृती करू असे त्यात म्हटले होते; मात्र दुर्देवाने परवानगीही देण्याचे काम शासनाकडुन झालेले नाही, असे 
त्यांनी सांगितले.

रस्ते अपघात कमी होण्यासाठी राज्यभरात कार्यरत असलेली सारथी सुरक्षा संस्था आणि सावंतवाडी पालिकेच्या वतीने आज येथे ‘वाहनांचा दहशतवाद’ या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जादुगार सतीश देशमुख, सारथी संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत मेस्त्री, धनंजय राजे भोसले, नगरसेवक भारती मोरे, दिपाली भालेकर, दीपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.

कोकणातील रस्तेच धोकादायक 
यावेळी श्री. मोरे म्हणाले, ‘‘राज्यातील अन्य ठिकाणापेक्षा कोकणातील रस्ते धोकादायक आहेत.  एका बाजूला दरी किंवा डोंगर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ओव्हरटेक केल्यांनतर अपघाताला तोंड दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी आपला जीव महत्त्‍वाचा आहे हे डोळ्यासमोर ठेवून वाहन चालविणे गरजेचे आहे.’’

मोरे म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून रस्त्यावर होणारे अपघात कसे रोखता येतील यासाठी देशभर जनजागृतीचे काम करीत आहोत. त्यासाठी शासनाकडून आम्हाला अधिकृत परवागनी देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली होती; मात्र दुर्देवाने सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे १०८ या मोफत रुग्णवाहीकेच्या सुविधे प्रमाणे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला पहिल्या तीन दिवसाचा खर्च मोफत देण्यात यावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्‍वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले होते; मात्र त्या आश्‍वासनाचा त्यांना विसर पडला आहे. शासनाकडुन रस्त्याच्या सुरक्षेसाठी घेतला जाणारा निधी त्याच कारणासाठी खर्च झाल्यास अनेक अपघात टाळण्यास मदत होईल.’’ 

यावेळी उपस्थित जादुगार देशमुख यांनी विद्यार्थ्याना जादुच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा कशी पाळण्यात यावी याची माहीती दिली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर तसेच अन्य मान्यवरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सिधुदूर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी राकेश पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com