सुवर्णदुर्ग किल्ल्याची होणार पुनर्बांधणी

दाभोळ- दापोली तालुक्‍यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला.
दाभोळ- दापोली तालुक्‍यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला.

पुरातत्त्व विभाग - भिंतीवरील झाडे काढणार, पावसाळ्यानंतर काम

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील हर्णै येथील ढासळणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पुनर्बांधणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. दगडी भिंतींवर वाढणाऱ्या पिंपळसदृश झाडांमुळे या किल्ल्याची मोठी हानी झाली आहे. ही झाडे मुळासकट काढून भिंतीला अनुरूप दगडांनी पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू होणार असल्याचे सूतोवाच पुरातत्त्व विभागाने केले आहे. 

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यात पुरातत्त्व विभागातर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्याची सांगता झाली. पुरातत्त्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ‘स्वच्छ स्मारक, स्वच्छ भारत’ अंतर्गत या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ सिंधुदुर्गातील विजयदुर्ग येथे १६ एप्रिलला करण्यात आला होता. ३० एप्रिलला हर्णै येथे सुवर्णदुर्ग या समुद्रातील किल्ल्यात त्याची सांगता करण्यात आली. यावेळी पुरातत्त्व विभागाने हा संकल्प जाहीर केला. येत्या पावसाळ्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे.

स्वच्छता मोहिमेंतर्गत पुरातत्त्व विभागाकडून सुवर्णदुर्ग किल्ल्यात पर्यटकांच्या वतीने टाकण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाद्याची प्लास्टिकची पाकिटे, अन्य कचरा गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. किल्ल्याच्या आत वाढलेली झाडी, गवत कापून किल्ला पर्यटकांना फिरण्याकरता स्वच्छ करण्यात आला. याबरोबरच किल्ल्याच्या तटांवर वाढलेली पिंपळ व वड सदृश झाडे तोडण्यात आली. यापुढे या झाडांची खोलवर गेलेली मुळे काढून ती झाडे पुन्हा वाढणार नाहीत, अशी मोहीम पुरातत्त्व विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. या झाडांमुळे किल्ल्याच्या तटांना अनेक ठिकाणी हानी पोचली आहे. यामुळे या बुरूजांच्या पुनर्बांधणीचे कामदेखील पुरातत्त्व विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सुवर्णदुर्ग किल्ल्याला खऱ्या अर्थाने नवीन रूप प्राप्त होणार आहे.
अनेक शतकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचे दगड डेक्‍कन लॅटराईट या प्रकारचे आहेत. हे दगड कोकणातील दगड खाणींमध्ये सहजासहजी सापडत नाही. यामुळे आता या किल्ल्याच्या बुरूजांच्या पुनर्बांधणीकरिता आवश्‍यक असणारा दगड जिल्ह्याच्या बाहेरून आणण्यात येणार आहे.

तसेच किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून ते वाळूपर्यंत पर्यटकांच्या सोयीकरता पक्‍क्‍या स्वरूपाच्या पायऱ्या व स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे. यापुढे किल्ल्याच्या देखरेखीसाठी व दररोज किल्ल्याच्या देखभालीसाठी किल्ल्यात २४ तास राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्याचाही मानस आहे. यामुळे किल्ल्याची दररोज स्वच्छता राखली जाईल, अशी माहिती पुरातत्त्व विभाग उपमंडळाचे संवर्धन सहायक राजेश दिवेकर व त्यांचे सहायक हिंमत जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com