शिरगावातील तरुणाने पारंपरिक पद्धतीने फुलवली कलमे

निरीक्षण, अनुभवातून कलमांच्या मशागतीचे नियोजन; संपूर्णपणे सेंद्रिय शेतीतून उत्‍पादन
Organic farming kalam mango
Organic farming kalam mango sakal

देवगड : अलीकडे शेती उत्पादन वाढीसाठी कीटकनाशके, संजीवके याचबरोबरच खत व्यवस्थापनाचा सर्वत्र बोलबाला असताना शिरगाव (ता. देवगड) येथील एका तरुण आंबा बागायतदार शेतकऱ्याने या रसायनांना फाटा देत पारंपरिक पद्धतीने बागायती फुलवली आहे.

माधव ऊर्फ नाना साटम आपल्या निरीक्षण आणि अनुभवातून आंबा कलमांचे रासायनिक खत विरहित नियोजन करून उत्पादन घेत आहेत. फवारणीचाही अतिरेक टाळत केवळ मोजक्याच फवारणीत उत्पादन मिळू शकते याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. संपूर्णपणे सेंद्रियशेती उत्पादन घेतले जात आहे. अलीकडे आंबा कलम व्यवस्थापन यावर मेळावे, चर्चासत्रे घेतली जातात. हवामान बदलाचा तातडीने पिकावर परिणाम जाणवतो. यामुळे उपद्रवी किटक, रोगराई याला आमंत्रण मिळून त्यातून पिकाचे संरक्षण करण्यासाठी फवारणी प्रमाणात वाढ करावी लागते. यामुळे फवारणी खर्चात वाढ होऊन एकूणच उत्पादन खर्च वाढतो. पर्यायाने उत्पन्न आणि खर्च यांचे आर्थिक गणित कोलमडते. प्रगत देशात पाठवल्या जाणाऱ्या रासायनिक उत्पादनामधील आंब्याची मागणी घटल्याने आपोआपच सेंद्रीय शेतीचा आग्रह धरला जावू लागला.

बाजारातही सेंद्रीय शेती उत्पादनाची मागणी वाढल्याने बागायतदारांनी त्यादृष्टीने लक्ष देण्यास सुरूवात केली. शिरगांव येथील प्रगतिशील शेतकरी नाना साटम यांनी सुरूवातीपासूनच रासायनिक खतांना दूर ठेवले. शेती उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय खताचा वापर केला जात होता. मात्र हळूहळू झाडांना सेंद्रीय खत देण्याचे प्रमाण त्यांनी कमी केले. मागील सुमारे ९ वर्षे त्यांनी झाडांना कसलेली खत दिलेले नाही. केवळ झाडाचा पडणारा पालापाचोळा यावरच झाडांचे पोषण होते असे त्याच्या लक्षात आले. खतांची मात्रा टाळून झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातात. झाडाखाली पालापाचोळा तसाच ठेवल्याने उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याचे बाष्प होण्याचे प्रमाण रोखले जाते. पावसाळ्यात हाच पालापाचोळा झाडांच्या मुळात टाकल्याने आपोआपच खतही मिळते. पावसाळ्यात झाडांना मोहोर किंवा पालवी आली तरी ती टिकवण्यासाठी कधी फवारणी करीत नाहीत.

फवारणीमुळे पावसात जमिनीतील गांडूळ तसेच अन्य उपयोगी किटक नष्ट होऊन जमिनीचे नैसर्गिक पोषण थांबते असा त्यांचा निष्कर्ष आहे. तसेच झाडावरील आलेल्या मोहोराचे संरक्षण करण्यासाठी वारंवार फवारणी करीत नाहीत. हंगामात दोन -तीनच फवारण्या घेतल्या जातात. अशा पध्दतीने आंबा उत्पादन घेताना सुरूवातीला पाच वर्षे उत्पादनात काहीशी घट झाली. मात्र आता आपोआपच उत्पादन वाढल्याचे ते सांगतात. आंबा कलमांचे पोषण चांगले होत असल्याचे त्यांच्या टवटवीतपणावरून लक्षात येईल असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात कपात झाल्याचा त्यांचा अनुभव सांगतो.

असा केला प्रयोग

बागांमध्ये सलग आंब्याची झाडे असल्यास रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. यासाठी बागांमध्ये फणस, रतांबा, चिंच तसेच जंगली झाडे असल्यास कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो असे त्यांचे निरीक्षण आहे. रायवळ तसेच अन्य कमी प्रतीच्या आंबा उत्पादनासाठी खत, फवारणीचा खटाटोप कोणीही करीत नाही तरीही उत्पादन भरघोस येते. हाच धागा पकडून नाना साटम यांनी हापूसच्या बाबतीत हा प्रयोग यशस्वी केला. हापूसबरोबरच काजू, नारळ, कलिंगड, भुईमूग, चवळी, भातशेती, उडीद, स्ट्राबेरी, मिरची, मका आदी उत्पादन साटम घेतात.

आंबा कलमांबरोबरच भातशेतीसाठी एकरी सुमारे अर्धा पिशवीच मिश्रखत वापरले जाते. यातून उत्पादन चांगले मिळते. झाडांना अतिरिक्त फवारणी आणि खते दिल्याने झाडांमध्ये आंतरप्रवाही रसायनांचा भडीमार होतो. हे विचारात घेऊन विषमुक्त शेती होण्यासाठी प्रयोग सुरू आहेत.

- माधव (नाना) साटम, प्रगतिशील आंबा बागायतदार, शिरगांव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com