आनंद अमृतराज यांची भूपतीसह पेसवर टीका
नवी दिल्ली - 'पेस-भूपती वाद म्हणजे जुन्या कथेतील नवा अध्याय आहे. या वादाने पुन्हा डोके वर काढणे दुर्दैवी आहे. यात दोघांचा दोष आहे,' असे वक्तव्य भारताच्या डेव्हिस करंडक संघाचे आधीचे "नॉन-प्लेईंग कॅप्टन' आनंद अमृतराज यांनी केले.
ते म्हणाले की, पेस खेळणार नसेल हे भूपतीने आधीच स्पष्ट करायला हवे होते. त्याने हे प्रकरण फार खराब पद्धतीने हाताळले. त्याने लिअँडरला "इ-मेल' का नाही पाठविला? त्याने रोहण बोपण्णाला खेळविण्याचे दोन महिन्यांपूर्वीच ठरविले होते, तर मग दोन अंतिम चार खेळाडूंमध्ये तू नसशील हे कळवायला हवे होते. लिअँडरला ताटकळत का ठेवले? त्याने एक मेल लिअँडरला पाठवून संघटनेला "सीसी' टाकायला हवा होती. हा सगळा गोंधळ टाळता आला असता.'
पेस लढत सुरू असतानाच बंगळूरमधून निघून गेला आणि आपला आदेश असतानाही प्रसार माध्यमांशी बोलला असा आक्षेप भूपतीने घेतला आहे. त्याबद्दल अमृतराज म्हणाले की, लिअँडरने बंगळूरमध्ये काही न करता बसून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. पहिल्याच दिवशी संघाने 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे पेसने अमेरिकेला प्रयाण करणे आणि पुढील स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी वातावरणाशी जुळवून घेणे जास्त फायद्याचे होते.
माजी खेळाडू विशाल उप्पल यांनी सांगितले की, अशा वादाचा तरुण खेळाडूंवर परिणाम होतो. महेश भारतीय टेनिसमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. लिअँडरशी झालेला खासगी संवाद त्याने जाहीर करायला नको होता.'
एकेरीचे चार खेळाडू निवडून भूपती उझबेकिस्तानच्या संघाला मूर्ख बनवीत होता का? अशा प्रकारे कुणीही मूर्ख बनणार नाही. मुळात आपल्याला खेळायला मिळेल याची खात्री नव्हती, तर लिअँडरने बंगळूरला येण्याची आणि अपमानित होण्याची गरजच नव्हती.
- आनंद अमृतराज
|