मुंबई - भारताने अखेर आशिया कप तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद गमावले असल्याचेच सांगितले जात आहे. याबाबतची केवळ औपचारिक घोषणाच शिल्लक असल्याचे काही तिरंदाजी पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, याची भरपाई करण्यासाठी पुढील वर्षी विश्वकरंडक स्पर्धा घेण्याचा प्रयत्न होत आहे.
भारतीय तिरंदाजी संघटनेचे काही पदाधिकारी दुसरी आशिया कप आणि पहिली विश्वकरंडक स्पर्धा यात बराच कालावधी आहे. त्यादरम्यान ही स्पर्धा होऊ शकेल, असा दावा करीत आहेत. त्यांनी अद्यापही या स्पर्धेचे भारताचे यजमानपद रद्द झालेले नाही. जागतिक अथवा आशियाई संघटनेने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, असे सांगितले. त्याचबरोबर मार्चमध्ये तिरंदाजी संघटनेची निवडणूक होईल, त्यामुळे केंद्रीय क्रीडा खातेही निवडीस आक्षेप घेणार नाही, असाही दावा हे पदाधिकारी करीत आहेत.
आशियाई तिरंदाजी संघटनेचे पदाधिकारी पर्यायी ठिकाणाबद्दल पर्यायी यजमानांचा शोध घेत आहेत. या परिस्थितीत योग्य पर्याय न मिळाल्यास ही स्पर्धा भारतातच होईल, असेही सांगितले जात आहे; पण बॅंकॉक, तैवान आणि तेहरानव्यतिरिक्त ही स्पर्धा कोण घेऊ शकेल, याचा विचार सुरू आहे. दक्षिण कोरिया हा पर्याय मानला जात होता; पण कोरियाने अद्याप तरी त्यास तयारी दाखवलेली नाही.
|