महाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा भाजपचा डाव :  अशोक चव्हाण

BJP to triangulate Maharashtra : Ashok Chavan
BJP to triangulate Maharashtra : Ashok Chavan


नांदेड : पूर्वीच्या निजाम राजवटीत असलेला मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये बिनशर्त सहभागी झाला. स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. परंतू, या भागाकडे भाजप शिवसेना युती सरकारचे वारंवार दुर्लक्ष झाले. गेल्या चार वर्षात काहीच केले नसल्यामुळे तेलंगणात जाण्याची सीमालगतच्या नागरिकांची मागणी वाढली आहे. या मागणीचा फायदा घेत महाराष्ट्राचे त्रिभाजन करुन वेगळा विदर्भ आणि मराठवाडा राज्य करण्याचा भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. 


नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या काही गावांच्या सरपंचानी विकास होत नसल्यामुळे तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून खासदार अशोक चव्हाण यांनीही भूमिका मांडली आहे. मराठवाड्याचा विकास करण्याची जबाबदारी सरकारची आहे. परंतू विद्यमान युतीचे सरकार साफ दुर्लक्ष करत आहे. या भागातील रस्ते तसेच उद्योगधंद्यांची परिस्थिती वाईट आहे. तसेच शेतकऱ्यांना मिळणारे वेगवेगळे अनुदान, कर्जमाफी, पिक विमा आदीबाबत नाराजी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची मागणी रास्त असली तरीही संयुक्त महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत विभाजीत होऊ नये, अशी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे.

मागासलेल्या मराठवाड्याला विशेष पॅकेज देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. परंतू शासन मात्र असे करताना दिसत नाही. 
वेगळे विदर्भ राज्य करण्याचे शासनाने यापूर्वीही अनेकदा आपल्या कृतीतून दाखवले आहे. परंतू १०८ स्वातंत्र्यसैनिकांचे हौतात्म्य दिलेला हा संयुक्त महाराष्ट्र आम्ही कधीच भाजप सरकारला तोडू देणार नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 
पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबईत मंत्रालयात बैठक घेण्याऐवजी नांदेडला घेणे गरजेचे होते. ही बैठक म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा शासनाचा प्रयोग असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रश्न निर्माण करुन ते सोडवायचे नाहीत व त्यातून जनतेचा रोष वाढला की त्याचा फायदा घेत राज्याचे त्रिभाजन करण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले. 

अशोक चव्हाण काय म्हणाले ...
एसटी भाडेवाढ ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त कर लागू आहेत त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह सर्व भाव वाढले आहेत. भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून आमचा इव्हीएम मशीनवरील विश्वास उडाला आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसची राष्ट्रवादी तसेच इतर जवळपास दहा समविचारी पक्षासोबत आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठांसोबत चर्चा करु शकतात. कॉंग्रेस पक्ष हा राज्यात शिवसेना, मनसे आणि एमआयएम या पक्षासोबत आघाडी करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com