नवी दिल्ली - फळे, भाजीपाला, दूध, अंडी, मांस, मासे यांसारख्या नाशवंत पदार्थांची साठवण करण्यासाठी आणि नासाडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 101 शीतगृहे (कोल्डचेन) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातील तब्बल 21 प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मुंबई-कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांतील आहेत.
भारत फळे, भाजीपाला उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश असला, तरी केवळ दोन टक्के उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. या नाशवंत मालाच्या साठवणीसाठी शीतगृहे आणि शीतसाखळ्यांची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन त्याबाबतच्या 101 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याचे अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितले. सरकारने कोल्ड चेन पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला असून त्यातून कोल्ड चेन ग्रीड तयार करायचा मानस असल्याचेही त्या म्हणाल्या.
या 101 कोल्डचेन प्रकल्पांच्या माध्यमातून 2.76 लाख मेट्रिक टन साठवणक्षमता, दर दिवसाला 56 लाख लिटर दूधप्रक्रिया क्षमता उपलब्ध होईल. महाराष्ट्रात 21 प्रकल्पांपैकी पुणे जिल्ह्यात पाच, सोलापूर जिल्ह्यात तीन, नाशिक आणि रायगड जिल्ह्यांत प्रत्येकी दोन, तसेच श्रीरामपूर, सातारा, नगर, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, चंद्रपूर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक अशा 21 कोल्ड चेन प्रकल्पांचा समावेश आहे. याखेरीज नागालॅंड, तमिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगण, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध प्रदेश, केरळ, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही कोल्डचेनची उभारणी केली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या वाट्याला...
- 21 - प्रकल्प
- 5 - पुणे जिल्ह्यात
- 3 - सोलापूर जिल्ह्यात
- प्रत्येकी 2 - नाशिक आणि रायगड जिल्ह्यांत
- प्रत्येकी 1 - श्रीरामपूर, सातारा, नगर, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, चंद्रपूर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांत
|