मुंबई - बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसावा, याकरिता राज्यात 250 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीबहाद्दरांना रोखण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याची विनंती केली आहे. मंडळाचे सदस्य, मुख्य अधिकारी यांची परीक्षा केंद्रांच्या भेटीदरम्यान केंद्र परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इंग्रजी आणि गणिताच्या परीक्षेवेळी बैठे पथक नेमण्याची सूचना विभागीय मंडळातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. कॉपी प्रकरणे कमी करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत पालक सभा, विद्यार्थ्यांचे प्रबोधन, परीक्षेत कॉपी न करण्याची प्रजासत्ताकदिनी शपथ घेणे आदी कार्यक्रम राबवण्यात आले होते.
|