नागपूर - भविष्यकाळात आर्थिक गुन्हेगारी हे आव्हान असून, त्याला तोंड देण्याची तयारी महाराष्ट्राने सुरू केली आहे. राज्यात गुन्हे उघडकीस येण्याचे, तसेच आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. सायबर गुन्हे वाढत असले, तरी त्याला आळा घालण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, की दाभोळकर, पानसरे यांच्या खूनप्रकरणी सीबीआय व कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्रातील पोलिसांनी मदत केली. दोन आरोपी पकडले असून, दोन फरारी आरोपींचा तपास सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत गुन्ह्यांची संख्या तुलनेने घटली आहे. त्याचवेळी दोष सिद्धी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्ह्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात तेराव्या क्रमांकावर आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास वाढला असून, सायबर कक्ष स्थापन केला आहे. 43 सायबर लॅब कार्यान्वित केल्या आहेत. पायरसी विरुद्ध मोहीम उघडली आहे.
|