मुंबई - डिजिटल स्वाक्षरी सातबारा सेवा 1 मेपासून होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली.
या घोषणेच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज चर्चा केली.
1 मेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणारा डिजिटल स्वाक्षरी सातबारा सर्व शासकीय व निमशासकीय कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी या संगणकीय सातबारावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही. याबाबतचा मुख्य कार्यक्रम 1 मे रोजी सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रत्येक जिल्ह्यात डिजिटल सातबाराचे उत्कृष्ट कार्य केलेल्या 100 तलाठ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचा फायदा
कमी वेळेत, कमी श्रमात शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. राज्यात 43 हजार 948 महसुली गावे आहेत. त्यापैकी 40 हजार महसुली गावांचे सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी 250 तालुक्यांतील 100 टक्के गावांचे सातबाराचे काम पूर्ण झाले आहे. अशा 30 हजार गावांना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाने हे केलेले ऐतिहासिक काम सद्यःस्थितीत अंतिम टप्प्यात आहे.
|