मुंबई - निवडणुकीत जनतेला आश्वासने दिली, सरकार येऊन अडीच वर्षे होत आली असून, दिलेला शब्द पाळा, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज सरकारला घरचा आहेर देत विरोधकांची भूमिका पार पाडली.
अर्थसंकल्पाच्या विविध विभागांच्या चर्चेत खडसे यांनी सरकारलाच धारेवर धरले. औद्योगिक क्षेत्रात राज्याची पीछेहाट झाली असल्याचा आरोप करत, आतापर्यंत राज्यात किती गुंतवणूक झाली? मुंबई, पुणे, नाशिक कॉरिडॉरवगळता राज्यात उद्योगांची स्थिती कशी आहे? उत्तर महाराष्ट्रात एखादा तरी उद्योग आला का, असे परखड सवाल सरकारला विचारले.
ऊर्जा विभागाच्या मुद्द्यावर त्यांनी जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण सरकारला करून दिली. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी वीज मिळत नाही. रात्री आठनंतर वीज देता, शेतकऱ्यांनी पेरणी रात्री करायची का, असा सवाल करत त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला. "बावनकुळे आपण फक्त विदर्भाचे ऊर्जामंत्री आहेत काय? विदर्भात कृषिपंपांना वीज मिळते, मग इतर भागांत का मिळत नाही, अशी विचारणा केली.
जळगावला 14 हजार शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्या शेतकऱ्यांना अजून विजेचे कनेक्शन का नाही, निवडणुकीत जनतेला चोवीस तास वीज देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले, अशा खड्या आवाजात त्यांनी बावनकुळे यांना सुनावले. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचे वीजबिल थकले असल्यास व्याज व दंड माफ करा, अशी त्यांनी मागणी केली.
राज्यात सध्या ऊन वाढतेय. काही ठिकाणी पाणीटंचाई सुरू झाली आहे. पिण्याच्या पाण्याबाबत सरकारने काय उपाययोजना केली आहे, त्याची माहिती सभागृहाला द्यावी. पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भविष्य काय, सुविधा देण्यासाठी जनतेला वाट बघायला लावू नका, अशी विनंतीही खडसे यांनी या वेळी केली.
'एमआयडीसी'तील भ्रष्टाचार रोखा'
राज्यातल्या औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) मधील भ्रष्टाचारावरही खडसे यांनी सरकारला सुनावले. गेल्या अनेक वर्षांत अनेकांनी महत्त्वाचे भूखंड उद्योगासाठी घेतले. मात्र, त्यावर उद्योग उभारले गेले नाहीत. त्यांच्यावर सरकारने गेल्या तीन वर्षांत काय कारवाई केली. "एमआयडीसी'मध्ये अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करतात. त्याला रोखण्याचे काम सरकारने केले पाहिजे, असेही खडसे यांनी सांगितले.
|