मुंबई - जलयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनांची कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज येथे केली.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्याशी संवाद साधला. या वेळी मल्लिक यांनी आदिवासी विभागातील रस्ते आणि विविध विकास योजनांच्या कामांचा तसेच शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीजपुरवठा, विहिरी, शेततळे याबाबत जिल्हानिहाय आढावा घेतला. शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली आहे.
जूनपर्यंत किमान दोन हजार किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करावे. विविध योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता नाही. निधीअभावी कामे राखडणार नाहीत याची जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षी असून, तिची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. यासाठी कृती आराखडा तयार करावा, या कामांमध्ये लोकसहभाग वाढवून योजनेची कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष द्यावे, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.
|