गड-किल्ल्यांना मिळणार गतवैभव 

गड-किल्ल्यांना मिळणार गतवैभव 

मुंबई - शत्रूची आक्रमणे झेलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे संरक्षण करणाऱ्या गड-किल्ल्यांना लवकरच गतवैभव मिळणार आहे. त्यांच्या संवर्धनासाठी 60 कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली, तर 30 कोटींची कामे प्रस्तावित आहेत. 

राज्यात साधारण पाचशेच्या घरात गड-किल्ले आहेत. त्यापैकी राज्य सरकारच्या अखत्यारित साधारण 45, तर केंद्राच्या अखत्यारित 50 किल्ले आहेत. पहिल्या टप्प्यात 14 किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. या कामात गडप्रेमी, सामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. साडेतीनशेहून अधिक किल्ले अजूनही खासगी मालकीच्या जागेत किंवा संस्थांच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाने केले नव्हते. गड-किल्ले संवर्धन समिती स्थापन झाल्यानंतर समितीने गडांच्या विकासासाठी अनेक सूचना केल्या होत्या. खासगी जागेतील किंवा संस्थांच्या ताब्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करण्यासाठी त्यांना पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आणण्याची सूचनाही समितीने केली होती. त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गडप्रेमी युवक-युवती स्वयंस्फूर्तीने किल्ल्यांवर सफाई मोहीम राबवतात. त्यांचा उपक्रम चांगला असला, तरी किल्ल्यांवर साफसफाई करताना अनेकदा ऐतिहासिक गोष्टींना धक्का लागतो. हे टाळण्यासाठी राज्याच्या विविध भागांत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्यातून किल्ल्यांचे संवर्धन आणि सफाईबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

रायगडसाठी 660 कोटी  
केंद्राच्या अखत्यारित असलेल्या किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 660 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला आहे. किल्ल्याच्या संवर्धन, विकासाबरोबरच तेथील परिसराचा विकास करणे, रस्त्यांची डागडुजी, बांधणी आणि पर्यटनवाढीसाठी पोषक व्यवस्था निर्माण करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. 

- पहिल्या टप्प्यात 14 किल्ल्यांचे संवर्धन 
- प्रत्येक किल्ल्यावर पाच कोटींची कामे करणार 
- पुणे विभागातील कोरीगड, रांगण, विशालगड या किल्ल्यांवर कामे सुरू 
- अंकाई-टंकाई, सालेर-मुनेर, लळिंग आदी किल्ल्यांचे लवकरच संवर्धन 

महाराजांच्या किल्ल्यांचे गतवैभव देशाला पुन्हा पाहता येईल. केवळ सरकार नव्हे, तर लोकसहभागातून संवर्धनाची कामे करण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी गडप्रेमींना विविध प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. गड-किल्ल्यांवरील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. 
- पांडुरंग बलकवडे, अध्यक्ष गड-किल्ले संवर्धन समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com