मुंबई - मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला होत असलेल्या महाराष्ट्र बंदची एसटीला धास्ती लागली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर विभागीय नियंत्रकांना काळजी घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने दिल्या आहेत.
मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ एसटीला बसल्यामुळे बंदच्या दिवशी सेवा सुरू ठेवायची की बंद, या संभ्रमावस्थेत व्यवस्थापन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील आंदोलनामध्ये सरकारवरील रोषाचा सगळ्यात जास्त फटका एसटीला बसला आहे.
5 जून 2017 ते 18 जुलै 2018 दरम्यान एकूण 222 एसटी बसचे 60 लाख 88 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनामध्ये 365 गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे महामंडळाला तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याशिवाय 22 कोटी 25 लाखांचा महसूलही बुडाला आहे.
मराठा समाजातील आंदोलक एसटीला लक्ष्य करीत नाहीत. काही समाजकंटक त्यांच्या आडून एसटीवर दगड मारतात. संघटनांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे एसटी सुरू राहतील. तोडलेल्या एसटी पुन्हा दुरुस्त करता येतील; पण मराठा आरक्षणासाठी गेलेले जीव परत येतील का?
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री
|