मुंबई - यंदा राज्याच्या महसुली उत्पन्नात 15 हजार कोटी रुपयांची तूट असली, तरी भविष्यात ती शून्यावर आणण्याचा निर्धार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे ही तूट येत आहे. महसुली तूट रकमेत मोजायची नसते. 2009-10 मध्ये महसुली तुटीची टक्केवारी 94 टक्के होती ती आता 55 टक्क्यांवर आणली आहे. ही तूट शून्यावर आणणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पाच्या पलीकडे जाऊन विचार आणि काम करावे करणार आहे. महसुली खर्च हा वेतन आणि निवृत्ती वेतन एकत्रित केले तरी 43 टक्के आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त आहे. हा खर्च कमी करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषणाच्या शेवटी मुनगंटीवार यांनी विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांच्या स्पष्टीकरणाची कागदपत्रे देत यातील चुका दाखविण्याचे आव्हान केले. यात चुका असल्याचे तुम्ही सिद्ध केले, तर याच सभागृहात तुमचे प्रश्न योग्य असल्याचे मी स्वत: सांगेन, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
मुनगंटीवार म्हणाले...
- "जीएसटी'मुळे महसूल 23 टक्क्यांपेक्षा वाढला
-जकात व स्थानिक संस्थांच्या कराची सरासरी 8 टक्के
-"मनरेगा'चा खर्च 2 हजार 88 कोटींनी वाढला
- 2003-04 मध्ये कॉंग्रेस आघाडीने शिवनेरीसाठी दहा कोटींची तरतूद केली. मात्र आजपर्यंत एकही रुपया दिला नाही.
- भयमुक्त, रोजगारयुक्त महाराष्ट्र आणि चिंतामुक्त विरोधी पक्ष असा महाराष्ट्र घडविणार
एकत्र निवडणुका लढविणार
राज्यात आगामी निवडणुका शिवसेना व भाजप एकत्रित लढविणार आहे. कोणी काहीही म्हणो; पण राज्यातील जनतेसाठी एकत्रित येणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी व्यक्त केला. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही तुमचेच पाहा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.
|