मोबाईलमुळे शेतीची कामे झाली सोपी 

मोबाईलमुळे शेतीची कामे झाली सोपी 

पुणे - ग्रामीण भागातही सर्वदूर पोचलेल्या मोबाईलमुळे आजवरच्या दुर्गम गावांमध्येही संपर्काची चांगली सोय झाली आहे. सातत्याने सुधारणा होत स्मार्ट बनलेला मोबाईल आर्थिकदृष्ट्या सामान्यांच्या आवाक्‍यात आला आहे. मोबाईलचा वापर केवळ बोलणे, मेसेज पाठवणे किंवा गेम खेळणे इतकाच मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतीच्या कामामध्ये तो मोलाची भूमिका बजावू लागला आहे. शेतकऱ्यांचे काम सोपे करण्यापासून ते त्यांना शेतीतील कामांबाबत तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन यांपासून ते बाजारपेठेची माहिती देण्यापर्यंत सर्व कामे मोबाईल करत आहे.

शेतीमध्ये सर्वाधिक फटका बसतो, तो हवामानातील अचानक बदलांचा. सरकारच्या "एम किसान पोर्टल'मध्ये ज्यांनी नावनोंदणी केली, अशांना हवामान आणि त्यावर आधारित कृषी, फळबाग आणि पशुपालन सल्ला मोबाईलवर मेसेजद्वारे मिळतो. ही सेवा 25 मे 2013 पासून सुरू आहे. त्यानुसार पिकांचे नियोजन केल्यास ती वाचवणे शक्‍य होते. "एम किसान सुविधा' ऍपद्वारे विविध माहिती, योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचते. शेतीच्या व्यवस्थापनासाठी, पिकातील कीड-रोग यांच्या नियंत्रणासाठी मोबाईल आणि इंटरनेट यांच्या जोडणीतून जीपीएस कार्यप्रणालीवर आधारित विविध बाबी सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे कीड रोगाच्या भविष्यातील प्रादुर्भावाचा अंदाज आधीच मिळतो. परिणामी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करता येते.

मोबाईलद्वारे कृषी सल्ला

  • निरक्षर किंवा अल्पशिक्षित शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त अशा प्रकारे चित्रे, तक्ते, रेखाटने, आलेखाद्वारे मजकूर मोबाईलद्वारे पाठवला जातो.
  • उदा. "टाटा कन्सल्टन्सी'चे "एम कृषी' किंवा एअरटेलचे "आयकेसीएल" किंवा "मायक्रोसॉफ्ट'चे "डिजिटल ग्रीन'. यामध्ये छोट्या व्हिडिओ क्‍लिप्स, डॉक्‍युमेंटरीद्वारे कृषी ज्ञानाचा प्रसार केला जातो.

सोशल मीडियाचा शेतीसाठी वापर
"व्हॉट्‌सऍप'सारख्या सामाजिक माध्यमाचाही शेतीतील तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी वापर होत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे "ऍग्रोवन'चे गट, ऊस संजीवनी गट आणि द्राक्षपंढरी गट.

  1. "ऍग्रोवन'चे व्हॉट्‌सऍप गट असून, त्यामध्ये प्रगतिशील शेतकरी, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ, कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या गटांत कृषी क्षेत्रांतील विविध समस्या, उपाययोजना आणि विचारांची देवाणघेवाण होते.
     
  2. ऊस संजीवनी : प्रगतिशील शेतकरी संजीव माने यांचा "एकरी शंभर टन ऊसउत्पादन' हा गट शेतकऱ्यांना केवळ उसासंबंधी माहिती, प्रश्न-उत्तरे, अडचणी यांबाबत प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन पुरवतो.
     
  3. द्राक्षपंढरी : मनोज जाधव, प्रशांत निमसे, अरविंद खोडे, हेमंत ब्रह्मेचा यांचा "द्राक्ष पंढरी' हा ग्रुप द्राक्षउत्पादकांना मार्गदर्शन करतो. बुरशीनाशकांच्या वापरामुळे खर्चात वाढ होते. अशा वेळी केवळ स्पर्शजन्य बुरशीनाशकांच्या योग्य वापराच्या खर्चामध्ये निम्म्यापेक्षा अधिक बचत करता आली आहे. त्याला त्यांनी "कॉन्टॅक्‍ट थिअरी' असे नाव दिले आहे.

कामकाजात आली सुलभता...
सिंचनासाठी पंपाचे स्विच हे मोबाईलद्वारे कोठूनही केवळ मेसेजद्वारे चालू, बंद करता येते. त्याबाबत हाय हिलटेक कंपनीचे संचालक तरंग पटेल म्हणाले, की मोबाईल स्विचमुळे रात्री अपरात्री वीज आल्यानंतर नदीपात्रापर्यंत जाण्याची गरज राहिली नाही. त्यातही आणखी सुधारणा करून मोबाईलद्वारे चालणारा संपूर्ण स्वयंचलित प्रोग्रॅमेबल कंट्रोलर तयार केला आहे. अगदी वीज गेलेली वेळ भरून काढून, तो नियोजनप्रमाणे सिंचन पूर्ण करतो. परिणामी, शेतकऱ्यांचे काम सोपे झाले आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार यांनी सांगितले, की पूर्वी ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याचे प्रमाण व कालावधी काढण्यासाठी स्थाननिहाय हवामानातील विविध घटक आणि पिकांचे गुणांक विचारात घेऊन गणिते करावी लागत. हे सामान्य शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरायचे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने "फुले इरिगेशन शेड्यूलर' आणि "फुले जल' ही दोन ऍप बनवली आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने पिकांचे बाष्पोत्सर्जन आणि ठिबक चालविण्याचा कालावधी काढणे शक्‍य झाले आहे. त्याचप्रमाणे "कृषिदर्शनी'ही ऍप स्वरूपात आणली असल्याने पीकनिहाय तंत्रज्ञान व शिफारशी तज्ज्ञांच्या संपर्क क्रमांकासह एका क्‍लिकवर उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com