मुंबई - मुंबई परिसरात शुक्रवारपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. आणखी दोन दिवस या सरी कोसळतील. सकाळी तसेच सायंकाळी हा पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मॉन्सूनपूर्व पाऊस पडत असला तरी नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली नाही. शनिवारी सकाळी वातावरणात काहीसा गारवा होता; मात्र दुपारनंतर पुन्हा उकाडा जाणवायला लागला. शनिवारी कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 29.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 34.8 अंश, तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
राज्यात शनिवारी महाबळेश्वर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर आदी भागांत पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. कोकण आणि विदर्भातील तापमानातही किंचितशी वाढ नोंदवण्यात आली. दक्षिण कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणखी तीन दिवस मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाला सुरवात होते. राज्यातील तुरळक ठिकाणी हा पाऊस पडतो. सध्या राज्यात सरासरीएवढेच, मे महिन्यातील अपेक्षित तापमान नोंदवण्यात येत आहे. विदर्भात काही दिवसांनी उष्णतेची लाट येऊ शकेल.
- के. एस. होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान विभाग
|