शेतकऱ्यांचे 200 कोटी वाचणार
मुंबई - बेदाण्यावरील "जीएसटी' 12 टक्क्यांवरून 5 टक्के कमी करण्यात आल्यामुळे बेदाणा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत "जीएसटी' परिषदेची 16 वी बैठक झाली. या बैठकीत 66 वस्तुंवरील "जीएसटी'मध्ये कपात केली आहे. केंद्राने वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) बेदाण्याचा समावेश केला होता. त्याचा फटका राज्यातल्या उत्पादकांना बसणार आहे, ही बाब कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्राला पाठवलेल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून निदर्शनाला आणून दिली होती. राज्यातील द्राक्षशेतीला वाचवण्यासाठी बेदाण्याला "जीएसटी'मधून वगळण्याची गरजही खोत यांनी पत्रात नमूद केली होती. त्याचबरोबर परिषदेच्या बैठकीत राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेदाण्याचा विषय लावून धरला होता.
महाराष्ट्रात द्राक्ष हंगामात दरवर्षी बेदाण्याचे दोन लाख टन उत्पादन होते. बाजारपेठेतील बेदाण्याच्या दराचा विचार करता दरवर्षी ही उलाढाल तीन हजार 200 कोटी रुपयांपर्यंत पोचते. केंद्राच्या निर्णयामुळे "जीएसटी'मध्ये सात टक्क्यांची बचत झाल्याने शेतकऱ्यांचे दरवर्षी जवळपास 200 ते 225 कोटी रुपये वाचणार आहेत. या निर्णयामुळे बेदाणा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात
खोत म्हणाले, ""बेदाण्यावरील "जीएसटी' शून्य टक्के करावा अथवा किमान पाच टक्केपर्यंत खाली आणावा यासाठी पाठपुरावा केला.
बेदाण्यावरील "जीएसटी' आता 12 वरून पाच टक्के झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ते शक्य झाले आहे.
|