नवी मुंबई - असुरक्षित कामगारांची संख्या राज्यभर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करण्यासाठी सरकारकडूनच कारखानदारांना संरक्षण दिले जाते, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे केला.
पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने "एमपीएमसी' मार्केटमध्ये त्यांचा सत्कार सोहळा झाला. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी माथाडी कामगारांना मार्गदर्शन करताना पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, 'कंत्राटी कामगार पद्धतीत कामगार सुरक्षित नाही, त्याला कधीही कामावरून काढले जाऊ शकते. कंत्राटदाराच्या मनात असेपर्यंत त्याची नोकरी. त्यामुळे कामगार चळवळीत देशाला मार्गदर्शन करणारे राज्य, असा नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्रात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत आहे. हे चित्र आपल्याला बदलावे लागेल. यासाठी माझी सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी आहे.''
पवार यांनी या वेळी वाढत्या महागाईवरून सरकारचा समाचार घेतला. महागाईमुळे आज अडचणींचे दिवस आले आहेत. जगात पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होत असताना आमच्याकडे मात्र त्यात वाढ होत आहे. यातून बेकारीचे प्रमाण वाढत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांचा "लेव्ही' प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात आपण नाशिकमध्ये जाणार आहोत. नाशिक बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप बनकर यांची भेट घेऊन माथाडी कामगार व व्यापारी यांच्यासमोर चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन या वेळी पवार यांनी दिले.
या वेळी माथाडी कामगारांच्या वतीने आमदार नरेंद्र पाटील व त्यांच्या मातोश्री वत्सला पाटील यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, शशिकांत शिंदे, महापौर सुधाकर सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते.
'मुख्यमंत्र्यांना भेटणार'
'शेतकऱ्यांची लूट होऊ नये, त्यांना वेळच्या वेळी शेतमालाचा मोबदला मिळावा, यासाठी बाजार समिती कायदा शाबूत ठेवा. यावर एक स्वतंत्र अध्यक्ष नेमून त्यांच्या खर्चाची जुळवणूक करण्यासाठी स्वतंत्र शाखा सुरू करा. हा प्रश्न मला यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडायचा होता. मात्र, त्यांना अचानक दिल्लीला जावे लागल्याने ते या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. त्यांची भेट घेऊन या प्रश्नांवर चर्चा करणार आहे,'' असे या वेळी शरद पवार यांनी सांगितले.
|