मुंबई - मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) केली असून, आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या (ता. 9) निघणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चाला "आरपीआय'चे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
मराठासह गुर्जर, जाट, लिंगायत, ब्राह्मण आदी जातींमधील आर्थिक मागासांना संसदेत कायदा करून 25 टक्के आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी राज्यघटनेचे संशोधन करून आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्के करावी, अशी मागणी आठवले यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या बैठकीत केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचा कायदा झाल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटके विमुक्त यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र श्रेणीत आरक्षण द्यावे. मराठा समाजाच्या भूमिकेचे स्वागत असून, राज्यात दलित व मराठा यांच्यात सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होईल,'' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
|