मुंबई - विधान परिषद पोटनिवडणुकीत ज्या पक्षाची जागा रिक्त होते त्या पक्षाच्या विरोधात शक्यतो उमेदवार देण्याची परंपरा नाही. हा नियम नसला, तरी आतापर्यंत कॉंग्रेसने सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाला अशा वेळी मदत केल्याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ही जागा कॉंग्रेसला सोडावी, असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.
नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे विधानपरिषदेची पोटनिवडणूक होत आहे. याबाबत अशोक चव्हाण म्हणाले की, या अगोदर कॉंग्रेसची सत्ता 1999 मध्ये आली त्या वेळी ना. स. फरांदे विधान परिषद अध्यक्ष होते. मात्र, त्यांना कॉंग्रेसने सत्तेत आहे म्हणून पदावरून दूर केले नाही. त्यांना सहकार्य करत त्यांचा कार्यकाळ होईपर्यंत कायम ठेवले.
त्याचबरोबर मागील वर्षी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूकीत भाजपची जागा असल्याने कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला. आताही कॉंग्रेस पक्षाची जागा रिक्त झाली आहे. ज्या वेळी विरोधी पक्षाची जागा रिक्त होते त्या वेळी आपसूकच विरोधी पक्षाकडे संख्याबळ नसते. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत ही जागा विरोधी पक्षाची असल्याने ती सोडावी. दरम्यान, कॉंग्रेस सोबतच आघाडीने विधान परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. तर, शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. भाजपने ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून, शिवसेनेला सोबत घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
|