मुंबई - विधानसभेची पोटनिवडणूक सोपी नसल्याने नारायण राणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली असली, तरी त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर यांनी "थांबा आणि पाहा' असे धोरण स्वीकारले आहे.
नारायण राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यावेळीच नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी तटस्थ राहण्याची रणनीती आखली होती. विधान परिषदेतील कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे याच जागेवर भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू शकतात. मात्र, विधानसभेची पोटनिवडणूक म्हणावी तेवढी सोपी नसल्याची जाणीव राणे व कोळंबकर यांना आहे. या दोघांनी कॉंग्रेस सोडली असती, तर विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला असता. 2014 च्या निवडणुकीत नितेश राणे कणकवली, तर कालिदास कोळंबकर वडाळा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकर अगदी अपक्ष म्हणूनही निवडून येऊ शकतात, असे त्यांचे कार्य आहे. मात्र, शिवसेनेचा प्रखर विरोध, दुखावलेली कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता, ही पोटनिवडणूक सोपी नसल्याने नितेश आणि कोळंबकर यांनी तांत्रिकदृष्ट्या कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केल्याची चर्चा आहे.
कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद शाबूत
नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारल्याने विधानसभेतील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्तास शाबूत असल्याचे चित्र आहे. विधानसभेत कॉंग्रेसचे 42, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 41 इतके संख्याबळ आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे आहे. नारायण राणे यांच्यासोबत नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी कॉंग्रेसचा त्याग केला असता, तर कॉंग्रेसचे संख्याबळ 40 वर आले असते आणि विरोधी पक्षनेतेपदाची माळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गळ्यात पडली असती.
|