मुंबई - महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे आठवे राज्यव्यापी त्रैवार्षिक अधिवेशन 24 ते 26 डिसेंबरदरम्यान पनवेलमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर हे स्वागताध्यक्ष असतील.
अधिवेशनाच्या निमित्ताने अंतर्गत सुधारणा करून वीज उद्योग वाचविण्याचा, तसेच अधिक प्रभावीपणे कार्यरत करण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. वीज उद्योगाची पूर्वीची आणि आताची स्थिती यात मोठा फरक आहे. याबाबत महासंघाने व्यवस्थापनाला अनेक उपाय सुचविले असून, त्याचाही ऊहापोह यानिमित्ताने होईल. ग्राहक हा केंद्रबिंदू मानून उद्योग व कामगारांवर दूरगामी परिणाम विचारात घेऊन व्यवस्थापन करण्यावर संघटना आग्रही असेल. वसुलीबाबतदेखील संघटनेच्या वतीने काही उपाय सुचविण्यात आले आहेत.
पूर्वी वीज उद्योगातील ग्राहकांची संख्या 80 लाख होती. आता ती मोठ्या प्रमाणात वाढूनही 80 हजार कर्मचारीच काम करत आहेत. त्यामुळे या अनुषंगाने विचार होण्याची गरज आहे. अंतर्गत सुधारणांच्या अनुषंगाने हा उद्योग अधिक भरभराटीला आणण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे, अशी माहिती अध्यक्ष अण्णासाहेब देसाई यांनी दिली.
|