राळेगणसिद्धी - आरोप सिद्ध झालेल्या राजकीय नेत्यांची यादी सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे मागणे म्हणजे लोकशाही बळकटीकरणाकडे टाकलेले प्रभावी पाऊल आहे. गुन्हे सिद्ध झालेल्या राजकीय नेत्यांना निवडणुका लढविण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, या मताशी मी सहमत आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कलंकित राजकीय नेत्यांवर गुन्हे सिद्ध का होत नाहीत, याबाबत न्यायालयाने अभ्यास करण्याचे ठरविले आहे. ही बाब देश व समाजासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व चांगली आहे, असे मत नोंदवून हजारे यांनी म्हटले आहे, की त्यासाठी लोकप्रतिनिधींवरील खटल्यांचा निकाल एका वर्षाच्या आत लागणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने विशेष न्यायालयाची तरतूद करणे गरजेचे आहे.
लोकसभा व विधानसभा ही आपल्या लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गेले, तर तो लोकशाहीस मोठा धोका आहे. त्यासाठी आरोप सिद्ध झालेल्या राजकीय गुन्हेगारांना निवडणुका लढविण्यास आजन्म बंदी घातली पाहिजे. त्यांना कायद्यानुसार जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याची तरतूद असली पाहिजे, अशी गरज हजारे यांनी व्यक्त केली.
|