माळीनगर - देशात 2018-19 च्या गाळप हंगामात 350 ते 355 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. 2017-18 च्या हंगामात देशात 322.5 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत पुढील हंगामात 28 ते 33 लाख टन अधिक साखर तयार होईल, असे "इस्मा'ने म्हटले आहे.
जून 2018 मध्ये उपग्रहामार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2018-19 च्या हंगामासाठी देशात 54.35 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. मागील हंगामात 50.42 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस होता. त्यातुलनेत पुढील हंगामासाठी त्यापेक्षा आठ टक्के अधिक उसाचे क्षेत्र आहे. 2013-14 व 2014-15 च्या हंगामातदेखील जवळपास 54 लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. उत्तर प्रदेशात पुढील हंगामासाठी 23.40 लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे. गत हंगामात तेथे 23.30 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस होता. "इस्मा'च्या मते, उत्तर प्रदेशात को-0238 या अधिक उत्पादन देणाऱ्या उसाच्या वाणामुळे तेथील उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे 130 ते 135 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात तेथे 120.5 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर 2017 दरम्यान वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने 2018-19 च्या हंगामासाठी उसाचे क्षेत्र 25 टक्क्यांनी वाढले आहे. मागील हंगामात राज्यात 9.15 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस होता. पुढील हंगामासाठी 11.42 लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे. पुढील हंगामात राज्यात 110 ते 115 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात राज्यात 107.15 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्ये देखील गतवर्षी वेळेत व पुरेसा पाऊस झाल्याने 2018-19 च्या हंगामासाठी तेथे उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील हंगामात तेथे 4.15 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस होता. पुढील हंगामासाठी तेथे 5.02 लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे तेथे 44.80 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात तेथे 36.54 लाख टन साखर उत्पादन झाले होते. तमिळनाडूत येत्या हंगामासाठी 2.60 लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस आहे. परिणामी तेथे नऊ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.
|