मुंबई - शिवसेना - भाजपच्या युतीचा वाद टोकाला गेलेला असताना युती नकोच, अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी घेतली आहे. मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना समर्थ असल्याचे त्यांनी भाजपला ठणकावले आहे.
सेना भवन येथे पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. 'युती झाली पाहिजे, असा आग्रह मुख्यमंत्री धरत असताना भाजपचे मुंबईचे अध्यक्ष व खासदार मात्र शिवसेनेवर भुंकण्याचे काम करत आहे. मात्र भुंकणारा कुत्रा चावत नाही हे आम्हाला माहीत असल्याने त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कोणाचे मंत्री, आमदार भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे घरी बसले आहेत हे मुंबईकरांना माहीत आहे,'' असा टोलाही त्यांनी भाजपला मारला. "अशा लोकांबरोबर युती करूच नका, मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यास शिवसेना समर्थ आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
|