पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धत सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने नुकताच घेतला आहे. या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत होत आहे, तथापि यात्रा कालावधीत एकाच वेळी दहा लाखांहून अधिक भाविकांची गर्दी झाल्यावर टोकन मिळवण्यासाठी रांगा लागतील, टोकन देण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडून गोंधळ होईल, टोकनवर छायाचित्र नसल्याने टोकन विक्रीचे गैरप्रकार होतील, अशा शंका व्यक्त होत आहेत. तसेच मंदिर समितीने ही योजना उत्तम पद्धतीने राबवण्यासाठी चांगले नियोजन करण्याची गरज आहे, अशी भावनाही व्यक्त होत आहे.
सध्या यात्रा कालावधीत ऑनलाइन बुकिंग यंत्रणा बंद ठेवली जाते. श्री विठ्ठल मंदिरात एका मिनिटाला जास्तीत जास्त 35 ते 40 भाविक, या हिशोबाने 24 तासांत सुमारे 50 हजारांच्या जवळपास भाविक दर्शन घेतात. त्याशिवाय स्वतंत्र रांगेद्वारे भाविक मुख दर्शन घेतात.
|