मुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर भाजपकडूनही प्रथमच थेटपणे प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेनेलाच जर युती नको असेल, तर मग भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव मांडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी टोकाची भूमिका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांपासून दोन्ही पक्षांतून विस्तवही जात नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी यापुढे युती होणार नाही, असे जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी एक, तर विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्ष शिल्लक असताना युतीसाठी भाजप अनुकूल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी सूचित केले होते. यावर मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी युतीची शक्यता फेटाळून लावल्यानंतर आम्हीही स्वबळावर लढू, असे मुनगंटीवार यांनी आज जाहीर केले.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी सरकारचे हे मनसुबे उधळून लावले. या मुद्द्यावर शिवसेनेचा विरोध कायम असेल, तर मग बदलत्या आर्थिक वर्षानुसार अर्थसंकल्पी अधिवेशन हे कदाचित नागपूरला घ्यावे लागेल, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.
|