नांदेड - 'मराठा आरक्षणाच्या विषयावर कॉंग्रेस कुठलीही कुरघोडी करत नसून, उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा?'' असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी उपस्थित केला.
फडणवीस यांनी केलेल्या निवेदनात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय पक्ष कुरघोडी करत असल्याचे म्हटले होते. त्यावर चव्हाण यांनी टीका केली. ते म्हणाले, ""आरक्षणावर भाजपचे नेतेच वेगवेगळे मत मांडत असल्याने खरे काय समजायचे? आरक्षणाच्या मुद्द्यावर मेगा भरती स्थगित करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देणारच आहात तर मग भरती स्थगित करण्याची गरज काय?''
सरकार आरक्षण देण्यास उशीर करत असल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच खासदार हीना गावित यांच्या मोटारीवर धुळ्यात हल्ला झाला. हा प्रकार अप्रिय आहे. कॉंग्रेस पक्ष हिंसाचाराचे कधीही समर्थन करत नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजप काहीच बोलत नसल्याचेही ते म्हणाले.
|