औरंगाबाद - पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रविवारी (ता. 21) सांगता झाली. यात दिग्दर्शक हर्षल मेहता, पद्मविभूषण अधुर गोपालकृष्णन यांच्यासह महोत्सवात आलेल्या सिनेमाच्या दिग्दर्शकांनीही प्रेक्षकांशी संवाद साधत आपला प्रवास उलगडला. चारदिवसीय या महोत्सवात औरंगाबादकरांना वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे रसग्रहण करता आले.
नाथ ग्रुप, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, एमजीएम आणि प्रोझोन यांच्या वतीने हा महोत्सव घेण्यात आला. यात पहिल्या दिवसापासून जागतिक दर्जाचे विविध भाषांतील सिनेमे दाखविण्यात आले. याचबरोबर सिनेमावर चर्चा झाली. यंदाच्या महोत्सवात सुवर्णकमळ मिळालेला "कासव', "सिटीलाइट', "नदी वाहते', "साउंड ऑफ सायलेन्स' यांसह इराणी आणि फ्रेंच सिनेमे आकर्षण ठरले. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत या वर्षी महोत्सावात विक्रमी गर्दी दिसून आली. रविवारी सुटी असल्यामुळे सकाळपासून प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी नऊ सिनेमे दाखविण्यात आले.
तरुणाईचा उत्साह
यंदा महोत्सवात उत्कृष्ट सिनेमासाठी एक लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यामुळे या महोत्सवात आपला सिनेमा यावा, यासाठी तरुणाई, नवे कलाकार, दिग्दर्शक कामाला लागले होते. चार महोत्सवांच्या तुलनेत यंदाचा महोत्सव हा तरुणाईने व्यापला होता. मार्गदर्शन आणि सिनेमांवर होणाऱ्या चर्चेमुळे सिनेमा कसा तयार होतो, तो इथपर्यंत कसा येतो, यावरही विचारमंथन झाले. महोत्सवासाठी सुबोध जाधव, निखिल भालेराव, गजानन उन्हाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
|