औरंगाबाद - भारतमाला प्रकल्पात समाविष्ट असलेल्या औरंगाबाद-पैठण-शेवगाव रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्तीसाठी सुमारे सव्वातीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. केंद्रीय रस्ते मंत्रालयाने या रस्त्यासह अन्य सहा रस्त्यांच्या कामांसाठी 26.71 कोटी रुपये मंजूर करीत शहरालगतच्या रस्त्यांचे मजबुतीकरण हाती घेतले आहे.
औरंगाबाद-पैठण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी, डांबरीकरण आणि दुरुस्ती करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने तीन कोटी पंधरा लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत असलेल्या या कामाची निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या कामाचे पैसे सरकारी तिजोरीतून देण्यात येणार असल्याने ही प्रक्रिया फेब्रुवारीअखेर पूर्ण होणार आहे. पावसाळ्यापूर्वी औरंगाबाद-पैठण-शेवगाव आणि अन्य सहा रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.
या कामाच्या निगराणीची दोन वर्षांसाठी सर्वस्वी जवाबदारी ही कंत्राटदारावर राहणार असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता या कामासाठी मॉनिटरिंग एजन्सी म्हणून काम करणार आहेत. त्यांनी दाखविलेल्या दोषाचे तक्रार प्राप्त झाल्याच्या सात दिवसांत निवारण करणे या निविदेत बंधनकारक करण्यात आले आहे.
|