विद्यार्थी, पालकांसाठी दुसरे पर्व; 52 भागांची पर्वणी
औरंगाबाद - विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाबाबत योग्य, समर्थ पर्याय सुचविण्याच्या उद्देशाने "साम टीव्ही'वर "शिक्षणाच्या वाटा' ही 52 भागांची महामालिका येत्या रविवारपासून (ता. 16 जुलै) सकाळी साडेनऊला प्रक्षेपित केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे पुनर्प्रक्षेपण शनिवारी सकाळी साडेदहाला होईल.
शिक्षणाचे सध्या मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालेले असताना विद्यार्थी, पालकांचा मोठा गोंधळ उडाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे "केजी' टू "पीजी' अशा व्यापक स्तरावर विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्याचे कार्य "शिक्षणाच्या वाटा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून "साम टीव्ही'ने हाती घेतले. त्यानुसार पहिल्या 52 भागांची मालिका प्रक्षेपित केली. त्यात देशभरातील विविध शैक्षणिक तज्ज्ञांनी शिक्षणाची नेमकी समस्या, अभ्यासाच्या पद्धती, शिक्षणातील स्पर्धा आदींवर विस्तृत मार्गदर्शन केले. "साम'च्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालकांनी स्वागत केले. पहिल्या पर्वातील 52 भागांना मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून "साम'ने या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची निर्मिती करत नव्या 52 भागांची आखणी केली आहे. "शिक्षणाच्या वाटा'च्या दुसऱ्या पर्वाची महात्मा गांधी मिशन संस्था (एमजीएम) ही मुख्य प्रायोजक तर "एज्यु. रिलायन्स लातूर पॅटर्न', औरंगाबादचा "आदर्श ग्रुप' सहप्रायोजक आहे.
|