पाच अग्निशमन केंद्रे अडकली निविदा प्रक्रियेत 

पाच अग्निशमन केंद्रे अडकली निविदा प्रक्रियेत 

औरंगाबाद - शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन पाच अग्निशमन केंद्रे उभारण्याचा निर्णय २००९ मध्ये घेण्यात आला होता. त्यासाठी शासनाने अनुदानदेखील मंजूर केले; मात्र आठ वर्षांनंतरही पाच केंद्र केवळ कागदावरच असून, अद्याप या केंद्राला एक वीटदेखील लागलेली नाही. त्यामुळे सध्या असलेल्या तीनच केंद्रांवर संपूर्ण शहराचा भार असून, गाड्या आगीच्या घटनास्थळी पोचण्यासाठी वेळ लागून मोठी हानी होत आहे. 

राज्य शासनाने २००९ मध्ये अग्नी सुरक्षा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. २००१ च्या (लोकसंख्या आठ लाख ७२ हजार) जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरून शहरात पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी एक कोटी ७८ लाख ५० हजार रुपये एवढे महापालिकेला अनुदान देण्यात आले. महापालिकेने शहागंज, पैठण रोड, हर्सूल, टीव्ही सेंटर, रोजाबाग येथे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. आठ वर्षे उलटली तरी या पाच अग्निशमन केंद्रांच्या फायलींचे ‘ऑफिस ऑफिस’ सुरू आहे. एकेका केंद्राच्या बांधकामाची तीन-तीन वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली; मात्र महापालिकेला कंत्राटदार मिळू शकला नाही. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यातील काही केंद्रांच्या बांधकामासाठी निविदा अंतिम करण्यात आल्या; मात्र काम कधी पूर्ण होईल, याची शाश्‍वती नाही. या संदर्भात कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप ही कामे निविदा प्रक्रियेमध्येच असल्याचे स्पष्ट केले. 

कंत्राटदारच मिळेना 
अग्निशमन सेवा अत्यावश्‍यक सेवेत मोडत असताना पाच केंद्रे उभारण्याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शहरात दरवर्षी महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात; मात्र अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी कोणी निविदाच घेत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेतर्फे केलेल्या कामाची बिले लवकर मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांत कंत्राटदारांनी महापालिकेच्या कामांकडे पाठ फिरविलेली आहे. त्याचाच फटका महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांना बसला आहे. 

काय सांगतो नियम 
साधारणतः पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असणे बंधनकारक आहे. शहरी भागात दहा चौरस किलोमीटरसाठी एक, तर ग्रामीण भागात ५० चौरस किलोमीटरसाठी एक अग्निशमन केंद्र गरजेचे आहे. सध्याच्या शहराच्या लोकसंख्येचा विचार केला असता, किमान १५ अग्निशमन केंद्रांची आवश्‍यकता आहे; मात्र प्रत्यक्षात केवळ तीनच अग्निशमन केंद्रे शहरात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com