औरंगाबाद - "छोट्या-छोट्या गोष्टींच्या तक्रारी करता. कुणी संघटनेला वेळ देत नाही. पक्षाची वाट लावली असून, सगळेच गोडबोले आहेत. आता अजितदादा, सुनील तटकरे येथे येतील तेव्हा हारतुरे होतील,
आऊटपुट काय तर शून्य. असेच असेल तर टाळे लावा या बिल्डिंगला (राष्ट्रवादी भवन). आताचे सत्ताधारी आपल्या विरोधात पंधरा वर्षे लढले, तरीही ते जगले ना? सत्तेच्या मागे धावून काय काम करायचे? निवडणूक हरल्यानंतर इतके हताश स्त्री-पुरुष मी कधी बघितले नाहीत. आपण लोकांपर्यंत जाण्यात कमी पडलो, अगदी वरपासून ते खालपर्यंत हे कबूल करायलाच हवे,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी औरंगाबादेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी शहर आणि जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'निवडणूक हरल्याने पक्षात स्मशानशांतता आहे. पराभवाने इतके हताश झालेले लोक मी कधी बघितले नाहीत. अमिताभचे चित्रपटही पडले; मात्र त्यांनी कधी हार मानली का? पवार साहेब काही रडत बसले का? पवार साहेबांनी एकदा नव्हे, तर तीनदा संघटना यशस्वीरीत्या बांधून चालविली. संघटनेचे काम हे नाती जोडण्याचे आहे. असेच बसून राहिलात तर तुम्हाला आणखी 25 वर्षे लागतील. आपले लोक आंदोलनात वेळेवर पोचत नाहीत. त्यांना ऊन लागते. कपडे खराब होतात. ऊन आहे म्हणून गॉगल लागतो. त्यांना खाली बसावेसे वाटत नाही. जुन्या पिढीने पक्ष वाढविला याचे आताच्या व्हॉट्सऍप पिढीला तर काहीच देणे-घेणे नाही. विद्यार्थी व युवक आघाडी काहीच काम करत नाही. त्यांचे सगळ्यांत वाईट काम दिसते.''
|