बीड - 'सरकारच्या घोषणा जोरदार आहेत; पण कृती शून्य आहे. मंत्रालयात जाळी बसवली असली तरी आणखी कुठे - कुठे बसविणार? राज्यात आणि देशात स्फोटक परिस्थिती असून, रोज माणसे मरत आहेत. बहुमत असल्याने सरकारला त्याच्याशी काही देणे - घेणे नाही,'' असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केला.
चव्हाण यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, विश्वजित कदम आणि पदाधिकाऱ्यांनी खळेगाव (ता. गेवराई) येथे गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाची आज पाहणी केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, 'राज्यात आता गारपीटग्रस्तांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी. मंत्रालयात जाळ्या बसविण्यापेक्षा शेतीमालाला दाम, बेरोजगारांच्या हाताला काम दिले तर आत्महत्या कमी होतील. गरिबांना द्यायला सरकारकडे पैसे नसले तरी काही उद्योगपती पैसे घेऊन पळून जात आहेत. त्यांना कोण वाचवतेय? आधी 35 हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली आणि आता कुठे 10 ते 12 हजार कोटी रुपये दिले.''
निवडणुकांसाठी तयार; आघाडीबाबत बोलणी
राज्यासह देशात परिस्थिती बदलत आहे. पक्षातर्फे ठिकठिकाणी शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला जात आहे. निवडणुका कधीही जाहीर झाल्या तरी कॉंग्रेस तयार आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीबाबत बोलणी सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी व सोनिया गांधी अंतिम निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आघाडीबाबत 22 फेब्रुवारीला बैठक होणार असल्याची माहिती खासदार चव्हाण यांनी दिली.
प्रत्येक निर्णयात संदिग्धता - विखे पाटील
सरकारच्या प्रत्येक निर्णयात चालढकलपणा, संदिग्धता आहे. कर्जमाफीचे आठ निर्णय बदलले. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. आता विलंबाचे व्याज बॅंकेने भरावे, असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. बॅंका शेतकऱ्यांकडे मागत आहेत. बॅनरवर तुमचे फोटो छापायचे तर त्याचे व्याज बॅंका किंवा शेतकऱ्यांनी का भरावे. कर्जमाफीत या व्याजाची तरतूद असावी. बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांना सरकारने आधी भरपाई द्यावी, नंतर कंपन्यांकडून वसूल करावी.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते
बीआयडी16डीडीपी01,02
खळेगाव (ता. गेवराई) : गारपिटीने झालेल्या नुकसानीची शुक्रवारी पाहणी करताना अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे.
|