एटीएसन केले चार जणांचे समुपदेशन
औरंगाबाद - दहशतवादी संघटनेशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शहरातील चौघांची मंगळवारी (ता. 11) व बुधवारी (ता. बारा) अशी दोन दिवस कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दहशतवादी संघटनांच्या गुप्त कारवाया लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथकाच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यातील संशयास्पद बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियातून होत असलेल्या संभाषणावर विशेष लक्ष असून, त्यातून हा प्रकार लक्षात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सिटी चौक परिसरातील चार तरुण इसिस अथवा इतर दहशतवादी संघटनेशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात असल्याचा संशय होता, त्यानुसार त्यांच्यावर दहशतवाद विरोधी पथकाची गेल्या काही महिन्यांपासून नजर होती. या तरुणांचे समुपदेशन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान यापूर्वी परभणी येथून इसिसच्या संपर्कात असलेल्या चार संशयितांना तसेच वैजापूर येथून एका संशयिताला एटीएसने अटक केली होती.
तेव्हाच काही दहशतवादी संघटना मराठवाड्यात आपले जाळे पसरवत असल्याचे स्पष्ट झाले होते. एटीएसच्या पथकाने शहरातील या चौघांना ताब्यात घेतले, त्यांची चौकशी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. तरीही त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या कारवाईबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
|